खानापूरमध्ये 87 घरांची अंशत: पडझड
बेळगाव : पावसाळ्यात खानापुरासह राज्यातील डोंगराळ भागातील शाळकरी मुले व ग्रामस्थांना नदी ओलांडता यावी यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खानापूर तालुक्यातील भुरणकी येथे भेट देऊन घराच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
नदी ओलांडणे सोयीचे व्हावे यासाठी पाच ते दहा लाख रुपये खर्चून छोटा पूल बांधण्याचा विचार करण्यात आला आहे. तसेच खानापूर तालुक्यात पूल बांधणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे
सध्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या घरांना मार्गदर्शक सूचनांनुसार भरपाई दिली जात आहे. मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, पूर्णपणे कोसळलेल्या घरांच्या बांधकामासाठी पाच लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेतला जाईल.
पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी कारवाई केली जाईल. नोव्हेंबरनंतर रस्ता बांधकामाचा आढावा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
खानापुरा तालुक्यात ८७ घरांची अंशत: पडझड झाली आहे. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे,अशी माहिती ही मंत्री जारकीहोळी यांनी दिली, तर चार घरे पूर्णपणे कोसळली आहेत. त्याचप्रमाणे नुकसानीचे प्रमाणही वाढू शकते, असे ते म्हणाले.