खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कणकुंबी-चोर्ला रस्त्याची यंदाच्या पावसाळ्यात झालेली दुरावस्था पहिली की तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी डोळेझाक करून दिवस काढले की काय असा प्रश्न प्रवाशांना होत आहे.
कणकुंबी-चोर्ला रस्त्यावरून खानापूर बेळगांव वाहतुक गोव्यापर्यंत केली जाते. हा महामार्ग नेहमीच वर्दळीचा असतो. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावर वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. गोवा बस वाहतुक या रस्त्यामुळे अनियमित धावत आहे. तर खानापूर कणकुंबी तसेच चोर्ला खानापूर बससेवा कोलमडली आहे. खराब रस्त्याचे कारण सांगून बसेस उशीरा धावतात. त्यामुळे शालेय तसेच काॅलेज विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
कणकुंबी- चोर्ला रस्त्या हा संपूर्ण घनदाट जंगलातून गेला आहे. त्यामुळे मुसळधार पावसामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याकडे गेल्या पाच वर्षांत संबंधित खात्याचे तसेच लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे,
अशी माहिती पारवाड ग्राम पंचायतीचे अध्यक्ष भिकाजी गावडे यांनी बोलताना दिली.
तेव्हा संबंधित खात्याने कणकुंबी चोर्ला रस्त्याची पाहणी करून लवकरात लवकर दुरूस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी प्रवाशीवर्गातुन होताना दिसत आहे.