खानापूर (वार्ता) : बेळगाव : कर्नाटकाची राजधानी बेंगळूरातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि अनगोळातील वीर संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा विटंबनेवरून निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण हळूहळू थंड होत असतानाच खानापूरात जगज्योती बसवेश्वरांच्या फोटोची आणि लाल-पिवळ्या ध्वजाची समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक हलशी गावात लाल-पिवळा जाळून बसवेश्वरांच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आली आहे.
ग्राम पंचायत आवारात कन्नड ध्वज जाळून तेथील चौकातील ध्वजस्तंभाच्या चौथर्यावरील जगज्योती बसवेश्वर यांची प्रतिमा असलेल्या फरशीला काळा रंग लावण्यात आला आहे. अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या या कृत्याचा सर्वभाषिकातून निषेध करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त वाढविला आहे.
या नीच कृत्याचा सर्व थरातून निषेध होत आहे. हे हीन कृत्य करणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी नंदगड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2021/12/halashi-660x323.jpg)