Sunday , September 8 2024
Breaking News

तिरडीवरून नेलेल्या आमगावच्या “त्या” दुर्दैवी महिलेचा अखेर मृत्यू

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला उपचारासाठी तिरडीवरून चार किलोमीटर आणावे लागले होते. गेल्या शुक्रवारी दुपारी आमगाव येथील महिला हर्षदा हरिश्चंद्र घाडी (वय 38) हिला दुपारी अचानक छातीत दुखून चक्कर येऊ लागली. त्यामुळे गावातील नागरिकांनी तिला प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा श्वास अडखळल्याने, तिला उपचारासाठी खानापूरला घेऊन येण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू झाला. मात्र तिला उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी रस्ता व वाहन नसल्याने, ते हतबल झाले होते. अखेर आमगाव शाळेचा कन्नड शिक्षक बाळेकुंद्री यांनी 108 या रुग्णवाहिकेला संपर्क साधून नदीच्या पलीकडे येण्यास सांगितले.
यानंतर हर्षदा घाडी यांना तिरडीवरून गावातील 20 ते 25 ग्रामस्थांनी, आळीपाळीने तिचे ओझे वाहत नदीच्या काठापर्यंत आणले. रुग्णवाहिका नदीच्या पलीकडे येऊन उभी राहिली होती. या महिलेला लोकांनी तिरडीवरून नदीच्या पलीकडच्या काठापर्यंत आणले. यानंतर रुग्णवाहिकेतून या महिलेला खानापूर इस्पितळात दाखल करण्यात आले. परंतु तिची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने तिला बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बेळगावच्या जिल्हा रुग्णालयातून पुढे तिला केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असतानाच काल रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला.
खानापूर तालुक्यातील अरण्य विभागातील दुर्गम भागात, आजही रस्ते, वीज तसेच इतर अन्य सुविधा नसल्याने, हा भाग सोयी सुविधा पासून वंचित आहे. आमगाव आणि दुर्गम भागातील जनतेच्या गंभीर समस्यांबाबत प्रसारमाध्यमांमध्ये अनेक वेळा व्यथा मांडण्यात आल्या आहेत. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांनी नेहमीच दुर्गम भागातील जनतेच्या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे कानाडोळा केला. त्यामुळेच आमगावातील त्या महिलेवर अशी दुर्दैवी वेळ आली.

About Belgaum Varta

Check Also

गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल हायस्कूलचे घवघवीत यश

Spread the love    खानापूर : गर्लगुंजी तालुका खानापूर विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *