
खानापूर : खानापूर तालुक्यातील कारलगा येथे उसाच्या फडाला लागल्याने ती आग विझविण्याच्या प्रयत्नात असलेल्या कारलगा येथील एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली आहे. आगीत होरपळून मृत्यू पावलेल्या सदर दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव तुकाराम रवळू पवार (वय 75) असे आहे.
सदर शेतकरी तुकाराम पवार यांनी काही दिवसापूर्वी आपल्या शेतातील ऊस कारखान्याला पाठविला होता. तर काही टन ऊस नवीन लागवड करण्यासाठी बियाणासाठी ठेवला होता. आज गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बियाणाजवळील उसाच्या रौंद्याला आग लावत असताना आगीने अचानक पेट घेतला व बघता बघता बियाणासाठी ठेवलेल्या ऊसाला आग लागली त्यामुळे ती आग विझविण्याच्या प्रयत्नात सदर शेतकरी गुदमरून खाली पडला आणि आग चारीबाजूंनी वेढली गेली आणि आगीत होरपळून मृत्यू पावला.
आग लागलेल्या शेतवडीत काही अंतरावर गावातील शेतकरी व त्यांचे कुटुंब शेतात काम करत होते. त्यांनी ही घटना पाहून आरडाओरड केली व आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सदर घटनेची माहिती गावात समजली व ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. ग्रामस्थांनी तात्काळ या घटनेची माहिती नंदगड पोलीस दिली. त्यामुळे नंदगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला.
या घटनेची माहिती खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली व वृत्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले व शवविच्छेदनानंतर मृतदेह तात्काळ कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याच्या पोलिसांना सूचना केल्या.
सदर मृत्त शेतकरी तुकाराम पवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कारलगा-चापगाव परिसरात व सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta