
खानापूर : बेळगाव-गोवा महामार्गावरील मलप्रभा नदी पुलावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील साईड पट्टीवर दुचाकी धडकल्यामुळे डोकीला जबर मार बसल्याने एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवार दिनांक 14 जून 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील भातकांडे गल्ली नंदगड येथील नागरिक परशराम गोविंद बेळगावकर हे उद्यमबाग (बेळगाव) येथील एका कारखान्यात कामाला होते. दररोज कामानिमित्त दुचाकीवरून येणे, जाणे प्रवास करत असत. आज नेहमीप्रमाणे आपले काम आटोपून आपल्या गावी नंदगडकडे जात असताना खानापूर शहरापासून नजीक असलेल्या बेळगाव-गोवा महामार्गावरील मलप्रभा नदी पुलावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. व दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईड पट्टीवर धडकली त्यामुळे त्यांच्या डोकीला गंभीर मार बसला व त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पाठीमागे बसलेला युवक अमोल सिताराम अष्टेकर (वय 20 वर्ष) बोंद्रे गल्ली नंदगड हा गंभीर जखमी झाला.
त्यांच्या पश्चात वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. अपघातात मृत्यू पावलेले परशराम गोविंद बेळगावकर यांचा हॉटेल व्यवसाय आहे. ते उद्यमबाग या ठिकाणी कामाला जात असल्याने, सध्या हॉटेल व्यवसाय त्यांचे वडील सांभाळत आहेत.
उद्या रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी सकाळी उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यानंतर नंदगड या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
अपघातात गंभीर जखमी असलेल्या अमोल सिताराम अष्टेकर याला बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास खानापूर पोलीस करीत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta