खानापूर : खानापूर तालुक्यातील बससेवा अनियमित असल्यामुळे शालेय विद्यार्थी व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या गैरसोयीकडे लोकप्रतिनिधींनी देखील दुर्लक्ष केल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे नंदगडवासीयांच्या समस्या ऐकणारेच कोणी नाही अशी काहीशी परिस्थिती येथील नागरिकांची झाली आहे. नंदगड येथील विद्यार्थी व नागरिकांना अनियमित बस सेवेमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नंदगड येथील बहुतांश विद्यार्थी शिक्षणासाठी खानापूर, बेळगाव किंवा हल्याळ येथे बसने प्रवास करत असतात. त्याचप्रमाणे या भागातील नागरिकांना देखील आपले दैनंदिन व्यवहारासाठी बेळगाव किंवा खानापूरला जावे लागते. अपुऱ्या बसेसमुळे नंदगड -खानापूर -बेळगाव या मार्गावर प्रवाशांना प्रतिष्ठान उभे राहावे लागते. एखादी बस आलीच तर जागा मिळते अन्यथा प्रवाशांना कसरत करावी लागते. यावेळी लहान मुले किंवा जेष्ठ नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागतो. एखादी बस चुकली तर विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांमध्ये वेळेवर पोहोचता येत नाही त्यामुळे त्यांना शैक्षणिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशीच काहीशी परिस्थिती सर्वसामान्य नागरिकांची देखील आहे. आपापल्या नोकरी व्यवसायासाठी किंवा इतर खाजगी कामासाठी ते बसवर अवलंबून असतात परंतु वेळेत बस मिळत नसल्याने नागरिकांची सर्व कामे रखडतात. काहीही करून आपल्याला इच्छित स्थळी पोहोचले पाहिजे या उद्देशाने प्रवासी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर धावणाऱ्या बसचे बस चालक व वाहक देखील मनमानीपणा करताना दिसून येत आहेत. बस थांब्यांपासून कधी पुढे तर कधी मागे बस थांबवतात त्यामुळे बस पकडण्यासाठी प्रवासांची धावपळ होते. अशात एखादा लहान- मोठा अपघात होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे व तात्काळ या मार्गावरील बस वाहतूक सोईस्कर करावी, अशी मागणी नंदगड भागातून नागरिक करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta