
जांबोटी : जांबोटी येथील मागासवर्गीय कॉलनीतील नागरिकांनी ग्रामपंचायतवर मोर्चा काढत पंचायतीतील भ्रष्टाचाराचा जाब विचारला. मागासवर्गीय कॉलनीच्या विकासासाठी मागासवर्गीय खात्यामार्फत आलेल्या विशेष निधीचा वापर न करता परस्पर पैसे लाटल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला.
गेल्या पाच वर्षांत मागासवर्गीय कॉलनीच्या विकासासाठी गटार बांधकाम, समुदाय भवन दुरुस्ती, सोलार दिवे, विजेची थकबाकी भरणे आदी विविध कामांसाठी निधी मंजूर झाला होता. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही कामाची अंमलबजावणी न झाल्याने कॉलनीमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या विहिरींमध्ये मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर संकट ओढवले असून, नागरिकांनी ग्रामपंचायतीवर तीव्र संताप व्यक्त केला.
या संदर्भात तत्कालीन ग्रामपंचायत अध्यक्षांनी, मंजूर झालेला निधी अजून खर्च झालाच नाही व तो ग्रामपंचायतीकडे पडून असल्याचे सांगितले. तर सध्याच्या ग्रामपंचायत सदस्यांनी, जर भ्रष्टाचार झाला असेल तर निधीची वसुली करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी भूमिका मांडली.
दलित नेते संतोष तलवार यांनीही नागरिकांच्या आरोपांना दुजोरा देत, मागासवर्गीयांच्या विकासासाठी आलेल्या निधीचा जाणीवपूर्वक दुरुपयोग झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी जिल्हा परिषद व संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येईल, तसेच गरज पडल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
या मोर्च्यामुळे ग्रामपंचायतीत खळबळ उडाली असून, नागरिकांच्या मागण्यांना प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta