कणकुंबी : विश्व भारत सेवा समितीच्या कणकुंबी येथील श्री माऊली विद्यालयातील दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ आणि शिष्यवृत्ती वितरण असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व माजी आमदार परशुराम नंदिहळ्ळी होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागतगीत आणि ईशस्तवनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि फोटो पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एस जी चिगुळकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी मुंबई येथील पेंढारकर कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक श्याम सायनेकर यांनी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना सांगितले की, माध्यमिक शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या समोर अनेक आव्हाने असतात, त्यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवनात पालक आणि शिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. या काळात जर पालक आणि शिक्षकांचे दुर्लक्ष झाले तर विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक संकटाशी सामना करावा लागतो. या वयात आपल्या समोर आव्हानं असतात याचीच मुलांना जाणीव नसते. म्हणून आपण त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. जेणेकरून आजचे विद्यार्थी उद्या आपल्या जीवनात यशस्वी झाले पाहिजेत.
यावेळी कणकुंबी वलय अरण्य अधिकारी देवेंद्र माने, लैला शुगर फॅक्टरीचे एम. डी. सदानंद पाटील, कवी आणि लेखक सुधाकर गावडे, पुण्यातील हिंदवी स्वराज्य हॉटेलचे मालक प्रकाश गावडे, कॅनरा बँकेचे मॅनेजर अण्णा रेड्डी व परशुराम नंदिहळ्ळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी माऊली देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम गावडे,रामगुरवाडी ग्रा.पं. माजी उपाध्यक्ष विनोद कदम, मुंबई येथील माऊली कुरिअर सर्व्हिसचे मालक विष्णू नाईक, नारायण वांद्रे,अनंत सावंत, रमेश खोरवी, किशोर महाडेश्वर, महेश नाईक, पवन गायकवाड, दौलत कोलीककर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हायस्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांना श्रीकांत किंजवडेकर, मोहन कोटीभास्कर, कै.गोविंद कोळेकर आदी शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. या वर्षीचा आदर्श विद्यार्थी म्हणून शुभम सुरेश गावडे तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून कुमारी सुवर्णा पांडुरंग गावडे व रविना रामनाथ चौगुले यांची निवड करून सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन सहशिक्षक एन एस करंबळकर यांनी केले तर बी.एम. शिंदे यांनी आभार मानले. याप्रसंगी पालक तसेच सर्व शिक्षक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta