अध्यक्ष भैरू पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
खानापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या अग्निपथ सैन्य भरतीला खानापूर तालुका आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी खानापूर येथील शिवस्मारकातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, अग्निपथ सैन्य भरतीत बरेच तोटे असुन अग्निपथ सैन्य भरतीत अग्नीवीराची भरतीचे वय योग्य नाही
निवृतीनंतर भविष्यात ठोस निर्णय घेणे शक्य नाही. केवळ सहा महिन्यात ट्रेनिंग परिपक्व होऊ शकत नाही. अग्निवीराना देण्यात येणारा पगार योग्य नाही. निवृत्तीनंतर पेन्शन नाही. इतर सोयी नाही. अग्निवीर हे सर्वाना नाही. असे तोटे असून फायदे मात्र चार वर्षासाठी नोकरी, नोकरीनंतर केवळ १२ लाख रूपये रक्कम मिळणार, ज्याची पात्रता असेल त्या केवळ २५ टक्के युवकांना कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची संधी, चार वर्षे सेवेनंतर काही क्षेत्रात राखीव जागा, सेवेत असताना उच्च शिक्षणाची संधी हे फायदे असून यावेळी आम आदमी पक्षाने काही मागण्या केल्या आहेत. मागील दोन वर्षांत जे परीक्षा पास झालेत त्यांना प्रथम संधी द्यावी. ज्याची लेखी परीक्षा व शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झालेत त्यांना प्रथम संधी देण्यात यावी. अग्निवीरांचे योग्य वय २२ वर्षे असावे. अग्निवीरांचा पगार सध्याच्या केंद्र सरकारच्या नियमानुसार असावा. निवृत्तीनंतर माजी सैनिकाना सर्व सवलती द्याव्यात. अशा मागण्या केल्या असुन जर केंद्र सरकार ह्या मागण्या मान्य करत नसेल तर आम आदमी पार्टीचा याला विरोध राहणार आहे, असे सांगितले.
यावेळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदाराना निवेदन देण्यात आले. तसेच खानापूर शहरात पत्रके वाटून जागृती करण्यात आली. यावेळी तालुक्यातील प्रत्येक खेड्यात पत्रके वाटून अग्नी पथाला विरोध दर्शविणार असल्याचे यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेला खानापूर तालुका आम आदमी पार्टीचे अध्यक्ष भैरू पाटील, सेक्रेटरी शिवाजी गुंजीकर, शहर अध्यक्ष गोपाळ गुरव, प्रभाकर पाटील, चंद्रकांत मेदार, रमेश कौंदलकर, पुंडलिक चौगुले, दत्तू कदम, महादेव कवळेकर, कर्याप्पा मेकीनकेरी, लबीब शेख, गंगाराम पार्सेकर आदी उपस्थित होते.