खानापूर (प्रतिनिधी) : बळ्ळारी येथे नुकत्याच पार पडलेल्या विद्याभारती राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवामध्ये खानापूरमधील शांतिनिकेतन शाळेच्या क्रीडापटूंनी 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली असून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या या क्रीडापटूंची निवड हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रस्तरीय विद्याभारती क्रीडा महोत्सवासाठी करण्यात आली आहे.
बळ्ळारी येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात राज्यातील 10 जिल्ह्यांमधील 25 शाळांच्या खेळाडूंनी भाग घेतला होता. या क्रीडा महोत्सवात शांतिनिकेतन शाळेच्या तेजस्विनी कोळी हिने हातोडा फेक स्पर्धेत सुवर्ण पदक आणि थाळीफेक स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. त्याचप्रमाणे अनुष्का कवंडलकर हिने चालण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक मिळविले. ओमकार नाडूरकर याने 400 मी. धावणे शर्यतीत सुवर्णपदक तर 100 मी. धावण्यात कास्यपदक मिळवीले. उत्कर्षा पाटीलने 3000 मी. धावण्याच्या शर्यतीत तृतीय क्रमांकासह कांस्यपदक मिळविले.
शांतिनिकेतन शाळेच्या श्रीहर्ष गौरव, प्रत्युष नाईक, शुभम पाटील व स्वयंम नाईक यांनी रिलेमध्ये चमकदार कामगिरी नोंदविली. या सर्व क्रीडापटूंना शाळेचे क्रीडा शिक्षक ओमकार सावंत व सागर कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta