नुकसान भरपाईसह ऊस दर निश्चित करा : तहसीलदारांना जैन यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी आणि महापूर काळात अनेक घरे पडली आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही. यंदाच्या हंगामातील ऊसाला सरकार आणि साखर कारखान्यांनी प्रतिटन ५५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.३१) सकाळी येथील बसवेश्वर सर्कल आणि शिवाजी सर्कल मध्ये रास्ता रोको आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन दिले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी दहा दिवसांचा कालावधी दिला असून तोपर्यंत भरपाईने मिळाल्यास रयत संघटनेतर्फे आंदोलन करणार असल्याचा इशारा चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला.
राजू पोवार म्हणाले, साखर मंत्र्यांच्या बैठकीत कारखान्यांनी यंदाच्या हंगामात ऊसाला प्रतिटन ५५०० रुपये देण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन साखरमंत्र्यांनी दिले होते. पण तोडगा न निघाल्याने बेळगाव जिल्ह्यात निरंतरपणे रयत संघटनेतर्फे आंदोलन सुरू ठेवले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी संघटित राहून रस्त्यावर उतरले तरच ऊसाला चांगला दर मिळण्यासह पीक नुकसान आणि घरे पडलेल्यांना भरपाई मिळणार आहे.
अतिवृष्टी महापूर काळात पिकांचे नुकसान होऊनही निपक्षपातीपणे सर्वे न झाल्याने शेतकरी भरपाई पासून दूरच राहिला आहे. त्याशिवाय परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली आहे. त्यामुळे तात्काळ ऊस दराचा तोडगा काढण्यासह पिकांची भरपाई न दिल्यास जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय शेतकरी राहणार नसल्याचे राजू पोवार यांनी सांगितले.
यावेळी बसव सर्कल पासून शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. त्यानंतर छत्रपती शिवाजी चौकात रास्ता रोको करून सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. तहसीलदार अजित जैन यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जैन यांनी निवेदन स्वीकारून साखर मंत्राकडे आपली मागणी पोहोचवणार असल्याचे सांगितले.
मोर्चामध्ये रयत संघटनेचे राज्य अध्यक्ष चुनाप्पा पुजारी, राजेंद्र नाईक, शिवानंद मोगलीहाळ, प्रकाश नाईक, रवी सुपनावर, उमेश भारमल, बाळासाहेब पाटील, संजय नाईक, सखाराम पाटील, मौलाना अली यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.