कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यात ’स्वच्छता ही सेवा’ अभियान दि. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत स्वच्छतेची शपथ घेवून या अभियानाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते ’स्वच्छता ही सेवा अभियान’ फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचार्यांना स्वच्छतेची शपथ दिली.
यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी शिल्पा पाटील, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, ’स्वच्छता ही सेवा’ अभियानात गावांची दृश्यमान स्वच्छता (नजरेला दिसेल अशी स्वच्छता) या संकल्पनेवर आधारित गावा-गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. वापरा आणि फेका या सवयीमुळे कचर्याचे प्रश्न निर्माण झाले असून प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छतेचे भान ठेवून आपल्या वर्तनामध्ये बदल केले पाहीजेत.
स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत ग्रामपंचायत करनूर, ता. कागल येथे संजयसिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महाश्रमदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या महाश्रमदान कार्यक्रमामध्ये स्वच्छतेचे जनजागृती उपक्रम, स्वच्छता फेरी तसेच स्वच्छतेची शपथ असे विविध उपक्रम घेण्यात आले. यावेळी प्रियदर्शिनी मोरे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, सदस्य, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले.
Belgaum Varta Belgaum Varta