मुंबई: आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सर्वांनाच दिलासा दिला असून न्यायालयाची भूमिका योग्य असल्याचं एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या मुद्द्यांना आता काही अर्थ राहिला नाही असंही ते म्हणाले.
विधानसभेच्या अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना दीपक केसरकर म्हणाले की, आता विधीमंडळात अध्यक्षांची निवड झाली आहे. आतापर्यंत बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. अविश्वास ठराव असो वा अपात्रतेचा विषय, हे आता निकालात निघाले आहेत. अपात्रतेच्या विषयावर सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.
एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरुन दूर करण्यासंबंधी सुनिल प्रभू यांनी याचिका दाखल केली होती. ती आता जवळपास निकालात लागली आहे. सेनेच्या याचिकेतल्या मुद्द्यांना आता अर्थ नाही असं दीपक केसरकर म्हणाले. विधीमंडळाला अनेक दिवस अध्यक्ष नव्हते, ही बाब योग्य नव्हती. आता अध्यक्षांची निवड झाली असून सर्वांना त्यांचे आदेश मानावे लागतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta