Thursday , December 11 2025
Breaking News

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र!

Spread the love

 

मुंबई : राज्याच्या राजकारणातून महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपस्थित होते. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र मैदानात उतरणार असल्याचेही यावेळी घोषणा करण्यात आली. सोबतच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित मेळावे देखील घेणार आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, या लढवय्या सहकार्‍यांचं मी स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचे कारस्थान सुरु आहे. यालाच लोकशाही मानणारे लोकं आता बेतालपणे बोलत आहेत. कोर्टातील निर्णय हा देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील, याचा निर्णय असेल. आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे असे मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असं ठाकरे म्हणाले.
दरम्यान ठाकरे पुढे म्हणाले की, मला आपण एकत्र आल्याचा आनंद आहे. आपली भूमिका रोखठोक आहे. ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत. आम्ही सत्तेत होतो, सत्ता पुढे येणारच आहे. काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात. ही आपली वैचारिक युती झाली आहे. महाराष्ट्रात आज जे काही घडवलं किंवा बिघडवलं ती महाराष्ट्राची ओळख नाही. शिवरायांचा महाराष्ट्र आहे असं काही जण म्हणतात पण तसं वागत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. आमचे हिंदुत्व पटल्याने संभाजी ब्रिगेड सोबत आली आहे. आपण दुहीच्या शापाला गाडून टाकू. संभाजी ब्रिगेडसोबत मतभिन्नता किती आहे यापेक्षा मतऐक्य किती आहे हे महत्वाचे आहे. दोन्ही पक्षांनी मतभिन्नता कुठं आहे यावर विचार करुन समन्वयानं काम करु.
लवकरच एक महामेळावा
मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना प्रबोधनकारांचा विचार आक्रमकपणे मांडला. त्यांनी संघप्रणित विषमतावादी विचारांना सर्वशक्तीनिशी कार्यपद्धतीने विरोध केला. ते लोकांच्या बाजूने कायम राहिले. संभाजी ब्रिगेड देखील लोकहित आणि महाराष्ट्राचं हित याच पार्श्वभूमीवर काम करत आहे. आता छोटे पक्ष संपवण्याचे कारस्थान सध्या सुरु आहे. लोकशाही सध्या धोक्यात आली आहे. छोटे पक्ष, संघटना आणि विचारधारा अस्तित्वात ठेवायची असेल तर एकत्र येणे गरजेचे आहे, त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. लवकरच एक महामेळावा घेतला जाईल, असे बनबरे यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *