Wednesday , December 10 2025
Breaking News

सरकारला एक महिन्याची मुदत : मनोज जरांगे यांचा इशारा

Spread the love

 

समाजाशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले असून, त्यांच्या उपोषणाचा आजचा 15 दिवस आहे. दरम्यान आज त्यांनी महत्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. “सरकार एक महिन्याचा वेळ मागत आहे. उद्या त्यांनी आम्हाला वेळ दिला नसल्याचे म्हणू नये. त्यामुळे असेही पंधरा दिवस गेले असून, सरकारला आणखी एक महिन्याचा वेळ देण्यात येत आहे. त्यांनी एक महिन्यात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. मात्र, तीस दिवस संपल्यावर 31 व्या दिवशी राज्यातील एकाही मंत्र्याला महाराष्ट्राच्या सीमेवर फिरकू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मुंबईत बैठक पार पडली. दरम्यान या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्हाला एक महिन्याचा वेळ हवा आहे अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे सरकारला एक महिन्याचा वेळ दिला पाहिजे. सरकारने या एक महिन्यात आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा. या एक महिन्यात हा प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा एकदा अमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला. तसेच एक महिन्यानंतर राज्यातील एकही मंत्र्याला महाराष्ट्राच्या सीमेवर फिरकू देणार नाही असा थेट इशाराही जरांगे यांनी दिला आहे.

अन्यथा भव्य सभा घेऊ…
आज पासून सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. या एक महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम सरकारने करावं. अन्यथा पुढच्या 12 तारखेला म्हणजेच 12 ऑक्टोंबरला मराठा समाजाची एक मोठी सभा होईल. या सभेत राज्यातील प्रत्येक मराठा सहभागी होईल. देशाच्या इतिहासात कधी नव्हे अशी ही सभा होईल. मराठ्यांचा आक्रोश या निमित्ताने जगाला पाहायला मिळेल. त्यामुळे सरकारला दिलेल्या एक महिन्यात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही अपेक्षा असल्याचे जरांगे म्हणाले.

वेळ दिला पण उपोषण सुरूच राहणार…
मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकार एक महिन्याचा वेळ मागत असून, त्यांना तो वेळ देण्यात येईल. मात्र, सरकारला वेळ दिला असला तरी माझं उपोषण सुरूच राहणार असल्याचे जरांगे म्हणाले. मी ज्या ठिकाणी बसलो आहे, त्याच ठिकाणी आरक्षण मिळेपर्यंत बसून राहणार आहे. जोपर्यंत मराठ्यांच्या हातात आरक्षणाचं पत्र येत नाही, तोपर्यंत माझ्या लेकरांचं चेहरा देखील पाहणार नसल्याचं जरांगे म्हणाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *