पंढरपूर : राज्यावरील पुढची संकटे दूर व्हावीत, बळीराजा सुखी समाधानी व्हावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुमाऊलीला साकडे घातले.
आज आषाढी एकादशीच्या पावन दिवशी पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर उसळला आहे. पंढरीत पहाटे अडीच वाजल्यापासून पूजा, टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठलनामाचा जयघोष सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. यावर्षी मानाच्या वारकरीपदाचा मान नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले आणि कल्पना उगले या शेतकरी दाम्पत्याला मिळाला. गेल्या १२ वर्षांपासून विठ्ठलभक्तीत लीन असलेल्या उगले दाम्पत्याने पहाटे मंदिरात थेट मुख्यमंत्री दांपत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली. पूजेनंतर त्यांचा शासकीय सत्कारही करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला अन् विठुरायाला साकडे घातले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाची पूजा करण्याची संधी मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “ही पर्वणी अत्यंत आनंददायी आहे. वारीच्या माध्यमातून भक्त आणि भगवंत यांच्यातील अंतर दूर होते आणि एक अनोखी अनुभूती प्राप्त होते. श्री विठ्ठलाच्या पूजेनंतर मला खूप समाधान वाटले. देवाला आपल्या मनातील सर्व काही माहित असते. मी माऊलीला प्रार्थना केली की, त्यांनी राज्याची काळजी घ्यावी आणि आम्हाला सद्बुद्धी व ताकद द्यावी, जेणेकरून बळीराजाच्या जीवनात आनंदाचे क्षण यावेत.”
“अनेक वर्षांपासून वारी सुरू आहे. मोगल काळ असो वा इंग्रज काळ, वारी कधीच थांबली नाही. वारीत संतांचा संदेश अनुभवायला मिळतो. दुसरीकडे ईश्वर क्वचितच दिसतो, पण वारीत तो प्रत्यक्ष भासतो. भागवत धर्माची पताका वारीच्या माध्यमातून कायम फडकत राहिली पाहिजे. महाराष्ट्राच्या प्रगतीत आध्यात्मिक प्रगती महत्त्वाची आहे. विठ्ठल-रखुमाई हे आराध्य दैवत आहेत. पांडुरंगाचा आशीर्वाद नेहमी मिळो. पांडुरंग मनातील भाव ओळखतो. राज्यावरील पुढील संकटे दूर होऊन बळीराजा सुखी आणि समाधानी राहो, अशी मी प्रार्थना करतो, असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.”
Belgaum Varta Belgaum Varta