
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत. अशातच अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पुरावे सादर करत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. रोहित पवार यांनी यावेळी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात असल्याचा मला संशय आहे असे मत व्यक्त केले. रोहित पवार यांनी यावेळी विमान कंपनीच्या मालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याच्याविरोधात कारवाई केली जावी अशी मागणी केली.
रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर तेरावा झाल्यानंतर मी माध्यमांसमोर येऊन सर्व माहिती देईल असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत अनेक पुरावे सादर करत खळबळजनक दावे केले आहेत. रोहित पवार यांनी सांगितले की, ‘मला सुद्धा शंका आहे हा घातपात असू शकतो. आम्ही याबाबत रिसर्च केला.’ रोहित पवार यांनी यासंदर्भात एका तज्ज्ञाशी चर्चा केली होती त्यावेळी त्या तज्ज्ञाने एका पुस्तकाचा संदर्भ दिला. त्याने सांगितले होते की, जर एखाद्या व्यक्तीला मारायचं असेल तर डेगन नावाचा एजंट आहे तो मारायची पद्धत त्या पुस्तकात दिली आहे. एखाद्या व्यक्तीला मारायचं असेल तर सोपा मार्ग काय तर तो चालक आहे त्याला मारलं तर विषय संपला. तो चालक म्हणजे पायलट.’
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत तो घातपात असल्याची चर्चा होत आहे. पण माझा काका गेला आहे. महाराष्ट्राचा फार मोठा नेता गेला आहे. याचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असे रोहित पवारांनी सांगितले. ते म्हणाले, ‘आदल्या दिवशी २७ जानेवारीला रोजच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार दादा संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्याला येणार होते. ताफा देखील लागला होता. पण दादा का निघाले नाहीत? दादा एका मोठ्या नेत्याला भेटणार होते. ते वेळेत येणार होते. तो नेता उशिरा आल्यामुळे आणि चर्चा उशिरापर्यंत सुरू राहिल्यामुळे दादांचा खूप वेळ गेला. दादा साडेपाच वाजता गाडीने जाणार होते उशिर झाल्यामुळे ते जाऊ शकले नाही. त्यांना पर्याय राहिला नाही. त्यामुळे त्यांनी संध्याकाळी विमान बुक केले.’
‘मला जे कळालं ते सही करावी लागते. फार महत्वाची फाइल आहे. चेक केले गेले ती फाइल कुठे आहे. फाइल घरी नव्हती. ती मंत्रालयात होती. दादांच्या कार्यालयात फाइल होती. ती फाइल मागवून घेतली गेली. येण्याजाण्यात, फाइल मिळेपर्यंत वेळ गेला. ती फाइल आल्यानंतर त्यावर सही करण्यात आली. एक मोठा नेता बोलतोय ती सही करावी लागेल. ती सही करण्यासाठी दादा थांबले. पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या फाइलवर सही करायची होती. त्यामुळे दादा थांबले होते का?’, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला.
रोहित पवार यांनी अजित पवारांना प्लान का बदलावा लागला? याबाबत देखील शंका उपस्थित केली आहे. ते म्हणाले की, ‘उशिर झाल्यामुळे दादांना प्लान बदलावा लागला. पण प्लान का बदलावा लागला. दादा कधीही विमान उडत असताना कॅप्टनला विचारायचे. काय अडचण आहे का? तुम्हाला वाटतंय ते करा. दादांचं एक मत होतं. जो एक्स्पर्ट आहे त्याचं ऐका. रिस्क घ्यायची नाही ही दादांची भूमिका असायची.’
तसचं, इमेलवर पायलटची दोन नावं आहेत. कॅप्टन साहील मदान आणि कॅप्टन यश अशी नावं होती. पण झालं असं की ही नावं दुसऱ्या दिवशी बदलली. टेकऑफपूर्वी पायलट का बदलले गेले? असं नाव का बदलले गेले. टेकऑफ करायचं असेल तर पायलटला आधीच यावं लागतं. ट्रॅफिकमध्ये अडकले असं सांगितलं गेले. आम्हाला ऐकायला मिळालं की ७ वाजता क्रू पोहोचले. क्रू एअरपोर्टला पोहोचले आहेत, असं सांगितलं. हे दोन पायलट ट्रॅफिकमध्ये अडकले असं सांगितलं जातं. मग सीसीटीव्ही बघितले का? सीडीआर बघितलं का? एअरपोर्ट जवळ होते का? ते तिथे कसे आले? ब्रेथ अॅनालाइजरची टेस्ट झाली का?’ असे सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलेत. ‘मागील १३ दिवस मला झोप लागली नाही. जोपर्यंत या गोष्टींचं उत्तर मिळत नाही, तोपर्यंत झोप लागणार नाही आणि मी शांत बसणार नाही.’, असा निर्णय रोहित पवारांनी घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta