बेंगळुरू : दरवर्षी उन्हाळ्यात महाराष्ट्राकडून कर्नाटकाला चार टीएमसी पाणी देण्याचा महत्वाचा निर्णय शनिवारी बंगळूर येथील बैठकीत झाला. पाणीवाटप, पूरनियंत्रण व जलाशयांमधील पाण्याचा विसर्ग या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री बी एस येडियुराप्पा व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.
उन्हाळ्यात कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती उद्भवते. त्यावेळी कर्नाटकाकडून कोयना जलाशयातून कृष्णा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जाते. शनिवारी बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. त्यावर उन्हाळ्यात पाणीटंचाई स्थितीत कर्नाटकाला चार टीएमसी पाणी दिले जाईल अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली. त्याच्या मोबदल्यात पावसाळ्यात कर्नाटक महाराष्ट्राला चार टीएमसी पाणी देईल असे ठरले. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.
महाराष्ट्रातील दुधगंगा प्रकल्प कर्नाटकासाठीही महत्वाचा आहे, तो प्रकल्प दोन वर्षात पूर्ण केला जाईल अशी ग्वाही पाटील यांनी दिली. कृष्णा व भीमा नदीच्या सिंचन क्षेत्रात पाणीवाटप व पूरस्थिती नियंत्रणासाठी दोन्ही राज्याचे मंत्री, सचिव व अधिकारी यांच्यात समन्वय ठेवण्याचा निर्णय झाला. पावसाळ्यात दोन्ही राज्यांमधील पावसाचे प्रमाण व धरणांमधील पाण्याचा विसर्ग संदर्भातील प्रत्येक क्षणाची माहिती दोन्ही राज्यांनी एकमेकांना देण्याचे बैठकीत चर्चेअंती निश्चित झाले.