
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन झाले आहे. चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेत मनोज कुमार यांना त्यांच्या देशभक्तीवरील चित्रपटांसाठी ओळखले जाते. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. उपकार, क्रांती यांसह अनेक चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या. दिग्दर्शनही केले. त्यांना भारत कुमार असेही म्हटले जाई ते याच कारणामुळे. त्यांच्या चित्रपटांमधली गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे, मोती या गाण्याशिवाय तर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन राष्ट्रीय सण साजरेही होत नाहीत. याच मनोज कुमार यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
मनोज कुमार यांच्या निधनाचचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मनोज कुमार यांनी चित्रपटांमधून काम करणं सोडलं होतं. मात्र त्यांनी अभिनय केलेले चित्रपट लोकांच्या स्मरणात आजही आहेत. ‘सहारा’, ‘हनीमून’, ‘पूरब और पश्चिम’, ‘मेरी आवाज सुनो’, ‘नसीब’, ‘नीलकमल’, ‘पत्थर के सनम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मनोज कुमार यांना नॅशनल अवॉर्ड, पद्मश्री पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टी हळहळली आहे.
मनोज कुमार यांचे टोपण नाव पडले होते भारत कुमार
मनोज कुमार यांना भारत कुमार या नावाने ओळखले जायचे. त्यांचे अनेक चित्रपट हे देशभक्तीचे महत्त्व सांगणारे होते. त्यामुळे त्यांना लोक भारत कुमार म्हणू लागले होते. हे नाव त्यांनाही खूप आवडले होते आणि त्यांनी ते आयुष्यभर मिरवले. रोटी, कपडा और मकान या चित्रपटातील त्यांची भूमिकाही गाजली. तसंच त्यांच्यावर चित्रित झालेली अनेक गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. क्रांती या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार यांच्यासह काम केले. या चित्रपटात हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर, परवीन बाबी, सारिका, प्रेम चोपडा अशी तगडी स्टारकास्ट होती. हा चित्रपटही त्यातल्या गाण्यांमुळे सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज कुमार यांनी केले होते तर त्यात मुख्य भूमिकाही साकारली होती.
मनोज कुमार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली आदरांजली
अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीतले आदर्श होते. त्यांच्या देशभक्तीविषयक चित्रपटांसाठी ते ओळखले गेले. तसंच त्यांच्या मनातही देशाभिमान होता. त्यांच्याकडून आम्हाला कायमच प्रेरणा मिळत राहिल. मनोज कुमार यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे सहवेदना. या आशयाची पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta