पाटणा : असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एमआयएमला बिहारमध्ये मोठा झटका बसला आहे. पक्षाच्या पाचपैकी चार आमदारांनी राजदमध्ये प्रवेश केला आहे. आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी बुधवारी पाटणा येथे सांगितले की, आता आरजेडी बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तेजस्वी यादव हे बऱ्याच दिवसांपासून एमआयएम आमदारांच्या संपर्कात होते.
राजदने बिहारमध्ये एआयएमआयएमला मोठा धक्का दिला आहे. तेजस्वी यादव म्हणाले, “बिहार एमआयएमच्या पाच पैकी चार आमदार आज आमच्या पक्षात सामील झाले आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करतो. आता आम्ही बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष आहोत. एमआयएमचे अख्तरुल इमान, सय्यद रुकनुद्दीन अहमद, शाहनवाज, मोहम्मद इझार असफी आणि अंजार नईमी निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले होते, ज्यामध्ये अख्तरुल इमान आता बिहारमध्ये पक्षाचे एकमेव आमदार राहिले आहेत. पक्षातील या फुटीमुळे एआयएमआयएमला मोठा धक्का बसला आहे.
बिहारमधील विधानसभा निवडणुकीनंतर तीन किंवा त्याहून अधिक आमदारांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी व्हीआयपी तिकिटांवर निवडणूक जिंकलेल्या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर पक्षाच्या आमदारांची संख्या 74 वरून 77 वर पोहोचली आहे. निवडून आल्यावर एकूण चार व्हीआयपी आमदार आले होते. मात्र, एका आमदाराचा मृत्यू झाला होता.
त्याचवेळी, आता निवडून आलेल्या एआयएमआयएमच्या पाचपैकी चार आमदारांनी आरजेडीमध्ये प्रवेश केल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाच्या एकूण आमदारांची संख्या 80 झाली आहे. पोटनिवडणुकीत राजदच्या खात्यात एका जागेसह पक्षाच्या एकूण आमदारांची संख्या 75 वरून 76 वर गेली.