Thursday , September 19 2024
Breaking News

गोव्यात राजकीय भूकंप? काँग्रेसचे 9 आमदार भाजपच्या वाटेवर

Spread the love

पणजी : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर आता गोव्यातही राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. गोव्यात काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाच्यावर आला असून पक्षाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे 9 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. सध्या नाराज आमदारांची मनधरणी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस नेते दिनेश गुंडू राव पक्षांतर रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, आमदार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं बोललं जात आहे.

गोवा काँग्रेसला मोठं खिंडार?

गोव्यात काँग्रेसचे केवळ 11 आमदार आहेत. त्यापैकी 9 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. जर आमदारांनी भाजप प्रवेश केला तर त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होऊ शकणार नाही. कारण त्यांची संख्या एकूण आमदारांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे.

गोव्यात इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

गोव्यातील काँग्रेसच्या बंडखोर आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश असून ते देखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी माहिती मिळत आहे. यापूर्वी 2019 मध्येही काँग्रेसला धक्का देत अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार की काय? अशा चर्चांनी जोर धरला आहे. दिगंबर कामत, मायकल लोबो, युरी आलेमाओ, संकल्प आमोणकर, डेलाला लोबो, अलेक्स सिक्कारो, केदार नायक आणि राजेश फळदेसाई काँग्रेसमधील हे आमदार भाजच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे.

भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या अटकेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिगंबर कामत म्हणाले की, अशा गोष्टी बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. सध्या मी माझ्या घरी आहे. काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडूराव सध्या गोव्यात असून आमदारांशी संपर्क साधून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

काँग्रेसचे 11 पैकी 9 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उत्तर देताना वरिष्ठ काँग्रेस नेते आणि आमदार दिगंबर कामत म्हणाले की, अशा चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहेत. सध्या मी माझ्या घरी आहे. काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडूराव सध्या गोव्यात असून आमदारांशी संपर्क साधून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सोमवारपासून सुरू होणाऱ्या गोवा विधानसभेच्या अधिवेशनाची रणनीती आखण्यासाठी शनिवारी आमदारांची बैठक बोलावली होती. ज्यामध्ये पार्टीचे सर्व 11 आमदार सहभागी होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसनं आपल्या उमेदवारांना वेगवेगळ्या धार्मिक स्थळी नेऊन पक्षनिष्ठेची शपथ दिली होती. त्यामुळे आता हे आमदार पक्षनिष्ठेची शपथ मोडणार की, पक्षाशी एकनिष्ठ राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

दोन लॉरी- बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

Spread the love  चित्तूर : दोन लॉरींची आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *