नवी दिल्ली : केंद्र सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी आज संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. तसेच जोपर्यंत देशभरात विविध ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकर्यांवरील गुन्हे मागे घेत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरुच राहिल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
आंदोलनाचे पुढील धोरण ठरविण्यासाठी तसेच केंद्र सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी आज संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. यामध्ये बलबीर सिंह राजेवाल, गुरुनाम चढूनी, युद्धवीर सिंह, शिवकुमार कुक्का, अशोक धावले यांचा समावेश आहे. याप्रश्नी 7 डिसेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चाची पुन्हा बैठक होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. संसदेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदे म्हटलं होते की, देशभरात शेतकरी आंदोलन काळात मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी आंदोलकांची माहिती नाही.
मागील वर्षभरात शेतकरी आंदोलनावेळी देशभरात 702 जणांचा मृत्यू झाला आहे. आंदोलनात मृत झालेल्या शेतकर्यांची यादी संयुक्त कृषी सचिवांना पाठवली आहे. या सर्व शेतकर्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.
