उत्तराखंडमधील केदारनाथ यात्रेच्या मार्गावर असलेल्या गौरीकुंडजवळ गुरुवारी रात्री दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या. येथील एका ठिकाणी मध्यरात्री दरड कोसळल्याने पायथ्याची दुकाने प्रभावित झाली. या दुर्घटनेत नेपाळमधील नागरिकांसह १२ जण बेपत्ता झाले असून, शोधमोहीम सुरू असल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, केदार खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. जवळच्या टेकडीवरून मोठ्या प्रमाणात ढिगारा आणि दगड पडले, ज्याने खाली बांधलेल्या दुकानांना प्रभावित केले. घटनेनंतर बेपत्ता लोकांचा शोध आणि सुटका करण्यासाठी स्थानिक लोक, पोलीस आणि एसडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले, मात्र सतत ढिगारा आणि दगड पडत असल्याने रात्री बचावकार्य थांबवावे लागले, असेही दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
रुद्रप्रयागच्या गौरीकुंडमध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. यामध्ये काही दुकानांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक पोलीस, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि इतर पथके दाखल झाली असून बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू आहे, अशी माहिती उत्तराखंड पोलिसांनी ट्विटरवरून दिली आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दलीप सिंह राजवार यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, “आम्हाला माहिती मिळाली की मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने 3 दुकाने प्रभावित झाली आहेत. त्यानंतर घटनास्थळी शोध मोहीम तात्काळ सुरू करण्यात आली असून, सुमारे 10-12 लोक तिथे होते असे सांगण्यात आले पण आतापर्यंत ते सापडले नाहीत, असेही सिंह राजवार यांनी स्पष्ट केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta