हैदराबाद : तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी निजामाबादमधील जाहीर सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील व्हायचे होते, असा दावा त्यांनी केला.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की,”तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे भारतीय जनता पक्षाच्या कट्टर विरोधकांपैकी एक समजले जातात. त्यांना पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील व्हायचे होते, परंतु मी त्यांना आघाडीत सामील होण्यास नकार दिला असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
पंतप्रधान म्हणाले की केसीआर यांना माहित आहे की त्यांच्या भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) एनडीएमध्ये सामील होण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, आम्ही तेलंगणातील लोकांचा विश्वासघात करणार नाही, असे सांगत नकार दिला. या नकारानंतर त्यांचे डोकं फिरले असल्याचेही मोदींनी म्हटले.
लोकशाहीला लुटीचे साधन केले
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, या लोकांनी लोकशाहीला लुटण्याच्या व्यवस्थेत बदलले आहे. त्यांनी लोकशाहीचे रुपांतर घराणेशाहीत केले आहे. हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीनंतर ते दिल्लीला भेटायला आले. त्यांनी माझ्याबद्दल प्रचंड प्रेम दाखवले. केसीआर यांचं असणे वागणं त्यांच्या स्वभावाला घेऊन नाही. केसीआर यांनी त्या भेटीत देश प्रगती करत असल्याचे म्हटले असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.
लोकांची फसवणूक कशी करणार?
पंतप्रधान मोदी म्हणाले की, केसीआर यांनी माझ्याकडे एनडीएमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांनी मला हैदराबाद महापालिका निवडणुकीत मदत करण्याची विनंती केली. परंतु मी त्यांना नकार दिला. आम्ही तेलंगणातील लोकांना फसवू शकत नाही असे सांगितले. त्यामुळे त्यांना राग आला असल्याचे केसीआर यांनी म्हटले.