नवी दिल्ली : सिक्कीममध्ये अचानक ढगफुटी झाल्याने तीस्ता नदीला पूर आला यामुळे भारतीय लष्कराचे 23 जवान बेपत्ता झाले आहेत. प्रशासनाकडून या भागात युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे प्रशासानाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
सिक्किममध्ये लष्कराचे 23 जवान बेपत्ता
सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग घटनास्थळी भेट देतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या दुर्घटनेत खोऱ्यातील काही भागांना फटका बसला असून लष्कराचंही नुकसान झालं आहे. गुवाहाटीतील संरक्षण पीआरओंनी दिलेल्या माहितीनुसार, ‘उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावाला अचानक पूर आला. यामुळे 23 जवान बेपत्ता आहेत.’
लष्कराची वाहनं पुरात वाहून गेली
गुवाहाटीतील संरक्षण पीआरओंनी सांगितलं की, ‘उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावाला अचानक पूर आला. यामुळे 23 जवान बेपत्ता आहेत. चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने डाउनस्ट्रीमच्या पाण्याची पातळी अचानक 15-20 फुटांपर्यंत वाढली. त्यामुळे सिंगतामजवळील बारडांग येथे उभी असलेली लष्करी वाहने वाहून गेली आहेत. यामुळे लष्कराचे 23 जवान बेपत्ता तर 41 वाहने वाहून गेली आहेत.
बेपत्ता नागरिकांचा शोध सुरु
भाजप नेते उग्येन त्सेरिंग ग्यात्सो भुतिया यांनी सांगितलं, “सरकारी यंत्रणा शोध आण बचावकार्यात गुंतले आहे. बेपत्ता नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अद्याप कोणतीही जीवित हानी झालेली नाही, पण सिंगताममध्ये सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आहे. काही लोक बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.