राजू पोवार : माजी मंत्री इब्राहिम यांना आवाहन
निपाणी (वार्ता) : ऊस दरासाठी रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी गेल्या तीन महिन्यापासून आंदोलन मोर्चे काढून सरकारला निवेदन दिले आहे. पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखान्यांनी कारखाने सुरू न करण्याच्या सूचना साखर मंत्री व साखर आयुक्तांनी केली आहे. तरीही अनेक कारखान्यांनी यंदाचा ऊसाचा हंगाम सुरू केला आहे. त्यासाठी विरोधी पक्षांनी याबाबत आवाज उठवावा, असे आवाहन माजी मंत्री सी. एम. इब्राहिम यांना रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी केले. इब्राहिम हे निपाणी दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेऊन राजू पोवार यांनी हे आवाहन केले.
राजू पोवार म्हणाले, साखर मंत्री व साखर आयुक्तांनी ऊस दराबाबत मुख्यमंत्र्यांची भेट करून देण्याचे आश्वासन दिले होते. पण मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत आश्वासन पाळलेले नाही. शिवाय ऊस दराबाबत कोणताही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे विविध शेतकरी संघटना आक्रमक बनल्या आहेत.
गेल्या दहा वर्षापासून साखर कारखाने प्रति टन २९००-३००० रूपयापर्यंत दर देत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षात बियाणे, खते, कीटकनाशके, इंधन, मजुरीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. त्या मानाने वरील दर शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे शेतकरी वर्षानुवर्षे कर्जबाजारी होऊन आत्महत्येकडे वळत आहेत. त्यासाठी साखर कारखान्यांनी प्रतिटन साडेतीन हजार तर सरकारने दोन हजार रुपये असे एकूण साडेपाच हजार रुपये दर देण्याची गरज आहे. म्हणून विरोधी पक्षांनी विधानसभेत उशिराबाबत आवाज उठवण्याचे आवाहन पोवार यांनी केले. यावेळी माजी मंत्री इब्राहिम यांनी माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते कुमारस्वामी यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी धजदचे जिल्हाध्यक्ष शंकर मडलगी, फैजुला माडीवाले, प्रसन्नकुमार गुजर, प्रताप पाटील, सुनिता होनकांबळे, मायनॉरिटी अध्यक्ष समीर बागवान, सैफ पटेल, सुभान नाईकवाडे, महिला अध्यक्षा भाग्यश्री कदम, अमित भिसुरे, नवाज नगारजी, रयत संघटनेचे उमेश भारमल, प्रा. हालप्पा ढवणे, नामदेव साळुंखे, सर्जेराव हेगडे, बाळासाहेब पाटील, बाबासाहेब पाटील, चिनू कुळवमोडे, बबन जामदार यांच्यासह रयत संघटना व धजदचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta