ऍड. अविनाश कट्टी : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थी आपल्या परिस्थितीला दोष देत शिक्षणातून माघार घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनाची दिशा भरकटले जात आहे. अशा परिस्थितीत बदलमुख येथील गवंडी कामगारांची मुलगी जानकी कांबळे एलएलबी परीक्षा उत्तीर्ण होऊन परिस्थितीवर मात केली आहे. त्यामुळेच तिला यश मिळाले असून तिचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घेण्यासारखा आहे, असे मत ज्येष्ठ वकील अविनाश कट्टी यांनी व्यक्त केले. बुदलमुख येथील जानकी कांबळे हिच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ अमझरी रस्त्यावरील आंबेडकर समुदाय भावनात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
प्रारंभी एलएलबी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जानकी कांबळे तिच्यासह दहावी अकरावी बारावीमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी, परिस्थिती कोणतीही असली तरी जिद्ध, चिकाटीने अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. तत्पूर्वी निश्चित ध्येय वाढवून वाटचाल केल्यास जीवनात यश दूर राहत नाही. ग्रामीण भागात राहून जानकी हिने वकिली परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. त्याचप्रमाणे समाजातील इतर मुलींनीही शिक्षणाकडे लक्ष देऊन जीवनात निश्चित ध्येय गाठण्याचे आवाहन केले.
यावेळी निपाणी, शिरगुप्पी, कारदगा, भोज, बोळेवाडी, बुदलमुख, भाट नांगनूर, हडलगाव, मतिवडे, अकोळ सौंदलगा, भिवशी, श्रीपेवाडी, हादनाळ सदलगा विभागातील नागरिकातर्फेही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास कॉम्रेड सी. ए. खराडे, कबीर वराळे, किरण कांबळे, प्रा. अजित कांबळे, अनिल ढेकळे, नेताजी कोळी, धनाजी कांबळे, अल्लाउद्दीन जमादार, परविन नाईकवाडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.