Wednesday , March 4 2026
Breaking News

सीमाभागाला मिळणार पाणी!

Spread the love

 

चिखली धरणातून सोडले पाणी : चार दिवसात पाणी वेदगंगेत

निपाणी (वार्ता) : काळमावाडी करार प्रकल्पाचे यंदाच्या हंगामात सीमा भागात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची मुदत संपली होती. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून या भागातील वेद गंगा नदी कोरडी पडली होती. त्यामुळे सीमा भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. ही बाब लक्षात घेऊन कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सीमा भागाला पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने माणूसकी जोपासून चिखली धरणातून वेदगंगेमध्ये पाणी सोडले आहे. चार दिवसात हे पाणी सीमाभागातील नद्यांना मिळणार असल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.
काळमावाडी करार नुसार सीमाभागातील सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वाटा संपला त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचा पाण्यासाठी टाहो सुरू होता. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींसह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. कर्नाटकच्या हिस्याचे चार टीएमसी पाणी दिले असताना सुद्धा काळम्मावाडी धरण प्रशासनाने माणुसकी दाखवत नानीबाई चिखली (ता. कागल) येथील धरणाच्या पाच दरवाज्यातून पुन्हा पाणी सोडल्यामुळे वेदगंगा पुन्हा दुथडी भरून वाहणार आहे. हे पाणी शेतकऱ्यांसह नागरिकांना वरदानच ठरणार आहे. याशिवाय सीमा भागातील पाणीटंचाई संपुष्टात येणार आहे.
आंतरराज्य पाणी करारानुसार नोव्हेंबर २०२२ ते २०२३ अखेर दर महिन्याला एकूण ४ टीएमसी पाण्यापैकी वर्गवारीनुसार वेदगंगेत चिखली धरणातून काळम्मावाडी धरणातून पाणी सोडले जाते. सद्यस्थितीत मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यातील पाणी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात अगोदर काही दिवस पाणी सोडले होते. या पाण्याचा उपसा झाल्याने सध्या वेदगंगा कोरडी ठाक पडली आहे. त्यामुळे कोरड्या टाक पडलेल्या वेदगंगेत आणखी किती दिवसांनी पाणी येणार याची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली होती. सध्या जून महिना उजाडला असला तरी एकही मोठा वळीव पाऊस झालेला शिवाय मान्सून पाऊस लांबल्याने पुन्हा एक वेळ सीमाभागाला पाणी द्या, अशी विनंती कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यासह पाटबंधारे खात्याच्या अधिका- यांनी केले होते. त्यामुळे सर्व मदार काळम्मावाडी धरण प्रशासनासह पावसावर अवलंबून होती.
या साऱ्याचा विचार करून स्थानिक लोकप्रतिनिधीसह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पुन्हा पाणी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार चिखली धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून चार दरवाजातून १फुटाने तर एका दरवाज्यातून २.५ फुटाने पाणी वेदगंगेत सीमाभागासाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे हे पाणी सिदनाळ बंधाऱ्यापर्यंत जाण्यासाठी अद्यापही चार दिवसाचा कालावधी लागणार आहे. असे असले तरी एकूणच वेदगंगेला पुन्हा पाणी आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
————————————————————–
‘नदी कोरडी पडल्यामुळे आमच्या हिस्याचे पाणी मिळाले असले तरी, माणुसकीच्या नात्याने लोकप्रतिनिधीसह आम्ही काळम्मावाडी धरण प्रशासनाकडे विनंती केली होती. त्याला प्रतिसाद देत धरण प्रशासनाने सीमा भागासाठी पाणी सोडले असून ते काटकसरीने वापरावे लागणार आहे. हे पाणी सिदनाळ धरणापर्यंत पूर्ण क्षमतेने थांबून राहण्यासाठी किमान सहा दिवसांसाठी उपसाबंदी लागू करण्याचे आदेश वीज मंडळाला दिले जाणार आहेत.
– बी. एस. लमाणी, पाटबंधारे अभियंता, अथणी विभाग

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *