पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची पाठ; व्यापारी चिंतेत, आर्थिक व्यवहार ठप्प
निपाणी (वार्ता) : यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर निपाणी तालुक्यातील दुकानदारांनी १० कोटींची गुंतवणूक केली आहे. मात्र वेळेवर पाऊस पडत नसल्याने व्यवहार ठप्प आहेत. याचा दुष्परिणाम आर्थिक उलाढालीवर होत आहे. एकीकडे पावसाच्या भरवशावर व्यापाऱ्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. तर दुसरीकडे पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोन्हीमुळे चिंतेचे वातावरण असून खते बियाणामध्ये १० कोटी रुपये अडकून राहिले आहेत.
प्रत्येक वर्षी हंगामात आलेल्या अडचणी व शेतकऱ्यांचे वाढती मागणी लक्षात घेऊन रासायनिक खते, बी बियाणे कंपनीकडे मागणी व बिलाचे धनादेश मे महिन्यात करीत असतात. यंदा खरिपाचा अंदाज घेऊन व्यापाऱ्यांनी नियोजन केले होते. मात्र पावसाळा वेळेवर सुरू झाला नाही. जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी शेतकरी बियाणे, खते खरेदी करण्यास धजावलेले नाहीत. परिणामी दुकानदाराकडे पेरणीसाठी आवश्यक साहित्य पडून आहे.
निपाणी तालुक्यात शहर आणि ग्रामीण भागात खते आणि बियाणे विक्रीचे १५ ते २० दुकाने मोठ्या आर्थिक उलाढालीची आहेत. तर प्रत्येक गावात प्राथमिक कृषी संघाद्वारे खाते कीटकनाशकांचा पुरवठा केला जातो. पण पाऊसच नसल्याने कृषी साहित्य विक्री दुकानासह प्राथमिक कृषीपतीने संघामध्ये साहित्य पडूनच आहे. खरिपासाठी उडीद, मूग, तूर, सोयाबीन, कांदा, बियाणे व खते मुबलक आहेत. बियाणाला परतावा नसतो, कमी पडू नये म्हणून मोठी गुंतवणूक केली जाते. त्याला वैधता मुदत असते. यामुळे आणखी चिंता वाढत आहे.
तालुक्यात आतापर्यंत जवळपास २० ते २५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे आता कुठे पेरण्यांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात खत अन् बियाण्यास मागणी वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.
——————————————————————-
‘निसर्गाच्या अवकृपेमुळे कृषी दुकानदार अडचणीत आले आहेत. बँकेचे व्याज भरमसाट वाढत चालले आहे. तालुक्यात पावसाचा अद्याप पत्ता नसल्याने व्यापार ठप्प झाला आहे. गोडावूनमध्ये कोट्यवधी रुपयांचे बियाणे, खते पडून आहेत. सर्व बाजूने अडचणीत आलेल्या व्यापाऱ्यांना शासन बँकेचे व्याज माफ करावे.
– मुन्ना काझी, कृषी साहित्य व खत विक्रेते, निपाणी
—————————————————————–
‘तालुक्यातील दुकानदाराकडे मुबलक खते, बियाणे पडून आहेत. कोट्यवधींचे भांडवल अडकले आहेत. वेळेवर पाऊस होत नसल्याने खरिपाचा फटका सर्वांनाच बसला आहे. यातून उभारी घेणे अडचणीचे आहे. यामुळे व्यापायांत सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. शेतकयांनीसुद्धा पुरेशा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.
-दीपक कौजलगी, प्रभारी कृषी अधिकारी, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta