निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांची तयारी; १५ दिवसात लावणी सुरू
निपाणी (वार्ता) : दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने निपाणी आणि परिसरात हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी थोडाफार सुखावला असून सोयाबीन पेरणीसाठी पाऊस न झाल्याने यंदा सोयाबीनचे क्षेत्र घटून थेट तंबाखूच्या लावणी सुरू करण्याच्या विचारात या भागातील शेतकरी आहेत. यावर्षी तंबाखूचे चांगले उत्पादन होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असून त्यासाठी आता वाफे तयार करून तंबाखू तरू टाकले जात आहेत. तरुंच्या वाढीसह तंबाखू लावण्यासाठी आता शेतकऱ्यांच्या नजरा दमदार पावसाकडे लागल्या आहेत.
सीमाभागातील निपाणी तालुका दर्जेदार तंबाखू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय शेजारीच असलेल्या महाराष्ट्रातील कापशी परिसरातही तंबाखूचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी जून महिन्यात सोयाबीन पेरणीसाठी पाऊस पेरण्या खोळंबल्या. परिणामी उशिरा सोयाबीन पेरणी केल्यास चांगले उत्पादन निघणार असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आता दरवर्षीप्रमाणे यंदाही तंबाखू उत्पादनासाठी करू निर्मितीच्या कामात झोकून दिले आहे.
चालू वर्षात ५ हजार हेक्टरवर तंबाखूच्या लावणी होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने कृषी विभागातर्फे तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
निपाणी तालुक्यात दरवर्षी १५ ऑगस्टनंतर तंबाखूची लागवड केली जाते. त्यासाठी आता केवळ महिन्याभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे रोपट्या अभावी तंबाखूच्या लावणी लांबणीवर पडू नयेत, यासाठी तंबाखूचे तरु घालण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच गादीवाफे तयार करून तंबाखू तरूंच्या निर्मितीचे काम सुरू केले आहे. १५ ऑगस्टपर्यंत पुरेसा पाऊस झाल्यावर सरीमध्ये तंबाखू लावण्याची तयारी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.
निसर्गाचा लहरीपणा, केंद्र व राज्य सरकारचे धोरण आणि व्यापाऱ्यांच्या मनमानी मुळे सुमारे निपाणी तालुक्यात वर्षानुवर्षे तंबाखू उत्पादन क्षेत्रात घटउत्पादनात घट होत आहे. शिवाय ऊस पिकाला कष्ट कमी लागत असल्याने अनेक शेतकरी या पिकासह भाजीपाल्याकडे वळले आहेत. अक्कोला, गळतगा, भोज, खडकलाट, ममदापूर, हुन्नरगी, सिदनाळ, बेडकिहाळ, बेनाडी, कुन्नूर, हंचीनाळ, आडी, बोळेवाडी, जैनवाडी परिसरातील बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणात तंबाखूचे पीक घेतात. पण सतत वाहणाऱ्या वेदगंगा आणि दूधगंगा नद्यामुळे तंबाखू बरोबरच आता उसाचे पीक घेतले जात आहे.
——————————————————————
* तंबाखूचे तरु घालण्यासाठी धांदल
* १५ ऑगस्टनंतर लागवडीचे काम
* शेतकरी पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत
* तीन वर्षांचे नुकसान भरून काढणे शक्य
* हिरवळीच्या खतासाठी ताग उडीदाची पेरणी
* स्वतः तरु निर्मितीकडे कल