कनिष्ठ राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे वनसंवर्धन
निपाणी (वार्ता) : पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वासाठी वनांची अत्यंत आवश्यकता आहे. ऑक्सिजनची निर्मिती, पशु पक्षी यांचा अधिवास वातावरणातील कार्बनडायक्साईडचे प्रमाण कमी ठेवणे, अनेक फळे- फुले, मातीची धूप थांबविणे अशा अनेक कारणांसाठी वनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे वन संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन देवचंद कॉलेजच्या प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ विभाग देवचंद कॉलेज अर्जुननगर मार्फत आयोजित वन संवर्धन व जंगलांचे महत्त्व या विषयावर त्या बोलत होत्या.
वाढती लोकसंख्या, वाढते, प्रदूषण, औद्योगिकरण अशा अनेक कारणामुळे दिवसेंदिवस वनांचे क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे वन दिवस साजरा करणे व विद्यार्थी, समाजामध्ये प्रबोधन करणे अत्यंत आवश्यक आहे असेही प्राचार्या इंगळे यांनी सांगितले. प्रा. अर्चना पाटील यांनी वनांचे महत्त्व व वन संवर्धन याविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनेक प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती भारतीय वनांच्या मध्ये आहेत. त्यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. वने आपली फुफुसे आहेत. आणि त्यामुळे त्यांचे संवर्धन होऊन वनांचे क्षेत्र विस्तारात होणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सजग असणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
देवचंद महाविद्यालयातील पर्यवेक्षिका एस. पी. जाधव यांनी एक वृक्ष यांची व्यथा मांडून विद्यार्थ्यांना वृक्षाविषयी ओळख करून दिली. सदर कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये वैष्णवी रानमाळे, कादंबरी कोंडेकर, श्रावणी लोहार आदिती गस्ते, बालिका देवळे व सानिका पट्टेकरी यांचा समावेश होता.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राहुल घटेकरी यांनी स्वागत स्वागत तर प्रिया हजारे यांनी सूत्रसंचालन. केले. प्रा. टी. ए. पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta