निपाणी (वार्ता) : येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित दस्तगीर साहेब दर्ग्यामध्ये भक्त परंपरा गेल्या ३०० वर्षापासून अबाधित आहे. निपाणीपासून जवळच असलेल्या यरनाळ ग्रामस्थांनाही संत बाबामहाराज यांच्या चमत्काराची अनुभूती आली आहे. त्यामुळेच यरनाळ ग्रामस्थांच्या वतीने गेल्या ३०० वर्षांपासून भाकरीचे पीठ प्रत्येक वर्षी ऊरूसासाठी आणून देत आहेत.
यंदाही मानाच्या भाकरीचे पीठ चव्हाण वाडा येथे दाखल झाले. उरूस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब देसाई-सरकार यांच्याकडे हे पीठ ग्रामस्थातर्फे ज्येष्ठ नागरिक दादासाहेब दत्तू पोवार यांनी
सुपूर्द केली.
गेल्या ३०० वर्षांपूर्वी यरनाळ येथील एका शेताच्या मोठ्या भूभागावर महिला, गर्भवती महिला, गाभण जनावरांचा प्रवेश निशिध्द होता. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या जीवावर बेतू लागले होते. अशा परिस्थितीत संत बाबामहाराज यांच्या महतीनुसार ग्रामस्थांनी त्यांच्या समोर आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानुसार महाराजांनी हजरत दस्तगीर साहेब यांच्या समक्ष प्रार्थना केली. एक उपाय सांगत या महान अवलियांच्या सेवेसाठी भाकरी पीठाचे दान करण्यास सांगितले. त्यांच्या प्रार्थनेला, त्यांच्या अध्यात्मिक शक्ती वर श्रध्देने विश्वास करून महाराजांनी सांगितलेल्या उपायांची अंमलबजावणी केली.त्यानंतर अनिष्ट नियमातून मुक्ती मिळाली. तेंव्हा पासून ग्रामस्थांची श्रध्दा अढळ होवून ऊरूसासाठी भाकरीचे पीठ देण्याची परंपरा आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे.
यरनाळ ग्रामस्थांच्या ५ व्या पिढीकडून नित्यनेमाने मानाचे भाकरी पीठ चव्हाण वारसांना सुपूर्द केले जात आहे. यावेळी दादू पोवार, हणमंत पोवार, धोंडीराम पोवार, अवबा पोवार, सागर पोवार, ज्ञानेश्वर पोवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.