
किर्तनकार बाबा महाराजांच्या स्मृतीस उजाळा; निपाणीत होता ३ दिवस मुक्काम
निपाणी (वार्ता) : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीला ७०० वर्षं पुर्ण झाल्याच्या निमित्ताने सन १९९६ मध्ये जेष्ठ किर्तनकार श्री बाबा महाराज सातारकर यांचे तीन दिवस येथील ‘मराठा मंडळ’मध्ये ज्ञानेश्वरीवर प्रवचन आयोजित केले होते. या समितीचे सल्लागार माजी आमदार रघुनाथराव कदम, तत्कालीन आमदार प्रा.सुभाष जोशी, उद्योगपती किरणभाई शाह हे होते. तीन दिवसाच्या मुक्कामात निपाणी व पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी त्यावेळी प्रवचनाचा लाभ घेतला होता. आता बाबा महाराज सातारकर यांच्या निधनामुळे त्यांच्या निपाणीच्या आठवणी ताज्या झाल्या.
एकदा महाराज म्हणाले ‘माझे वय ८३ आणि माझी वारी ८४ वी. त्याचे कारण म्हणजे माझी एक वारी आईच्या पोटात झाली आहे.’ त्यांनी वारी कधीही चुकवली नाही. त्यांनी आपले आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केले. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचाराद्वारे कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केले.
आठ महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी रुख्मिणी उर्फ माई सातारकर यांचे निधन झाले. आता सातारकर घराण्याची कीर्तनाची परंपरा बाबा महाराजांचा नातू पुढे चालवत आहे. बाबा महाराजांनी सुमारे १५ लाख लोकांना वारकरी संप्रदायाची दिक्षा देत व्यसनमुक्त केले. निपाणी येथील कार्यक्रमात तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव यांच्या रचना त्यांनी कीर्तनातून सांगितल्या होत्या.
तुळशी माळ घालुन हरी भक्तीचा मार्ग दाखविला होता. आजही तो क्षण अनेकांना आठविला. एकादशी दिनी बाबा महाराज यांनी वैकुंठ गमन केले. त्यानी आयुष्यभर हरीनाम व संताचे तत्वज्ञान कीर्तन,भजनाद्वारे समाजात ज्ञानदीप लावणेचा प्रयत्न केला. आपल्या अमृत वाणीने घरोघरी ज्ञानोबा, तुकाराम यांचे तत्वज्ञान घरोघरी पोहोचले. असे हे महान किर्तनकार बाबा महाराज यांच्या निधनाने वारकरी संप्रदाय पोरका झाला आहे. निपाणीतील त्याच्या सहवासात आलेल्या अनेकांना किर्तनकार बाबा महाराज सातारकर याच्या निधनाची वार्ता ऐकून दुःख अनावर झाले होते. निपाणीतील सर्व जातीधर्माचे लोक त्यावेळी या प्रवचन सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले होते. विठ्ठलाशी एकरुप होणारे बाबा महाराज सातारकर यापुढील काळात आपल्याला कायमच जाग आणत राहतील.
Belgaum Varta Belgaum Varta