राजेंद्र वड्डर – पवार : गळतगा येथे धम्म चक्र प्रवर्तन दिन
निपाणी (वार्ता) : देशाच्या स्वातंत्र्यानंतर समाजाकडून मूर्तीची निर्मिती आणि मंदिरांची निर्मिती करण्यात येत असते. पण त्यांनाच मंदिरात देव दर्शनासाठी प्रवेश नाकारला जात होता. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरात सत्याग्रह करून दलितांना मंदिर प्रवेशासाठी आंदोलन केले. त्यामुळेच दलित, बौद्ध बांधव समाजाला मानाचे स्थान मिळाले आहे. महिला, नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्याचे काम भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरानी केले आहे, असे मत माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर- पवार यांनी व्यक्त केले. गळतगा येथे रमाबाई आंबेडकर सर्कल तरुण मंडळातर्फे आयोजित धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, माता रमाबाई आंबेडकर यांच्या नावाने जयघोष करण्यात आला. त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना व पंचशील तत्वाचे गायन झाले.
यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून धम्म चक्र परिवर्तन दिना बाबत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.
यावेळी निखिल कांबळे, उमेश जाधव, नागराज शास्त्री, युवराज शास्त्री, संकेत कट्टी, दिग्विजय मड्डे, जिनेंद्र मड्डे, अनिल शास्त्री, भीमा दीक्षित, सूरज मुगळे, अक्षय परांजपे, चंद्रशेखर कांबळे विनोद शास्त्री, चेतन कांबळे, चेतन दीक्षित, अमोल कांबळे यांच्यासह उपस्थित होते. प्रतीक दीक्षित यांनी आभार मानले.