
निपाणी (वार्ता) : मनोज जरांगे यांनी आरक्षण मराठा समाजाला मिळाले पाहिजे. यासाठी गेली तीन महिने झाले उपोषण करून महाराष्ट्र सरकारकडून आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसले नाहीत. त्याचा आनंद उत्सव मत्तीवडे गावामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी छ. शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी अध्यक्ष बंडा पाटील यांच्या हस्ते करून फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य जयसिंग मोरे यांच्या हस्ते नारळ वाढविण्यात आला. परशराम कदम म्हणाले, मनोज जरांगे एक सामान्य माणूस आंदोलन व उपोषण करून लोकांच्यामध्ये जागृती निर्माण केली. मराठा समाजात सध्या मागासलेपणा जास्त आहे. नोकऱ्या मिळेनात म्हणून तरुण आत्महत्त्या करत आहेत. तरुण नैराश्यचे गर्तेत अडकला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शिक्षण व सरकारी नोकरीमध्ये मराठ्यांना आरक्षण दिलेच पाहिजे, असा ठाम निर्णय मराठा समाजाने घेतला. मनोज जरांगे यांचे नेतृत्व मान्य करून सरकारवरती दबाव आणला. लाखों लोक रस्त्यावर उतरून आपला आक्रोश दाखवला.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाचे मार्गदर्शक हिंदुराव मोरे यांनी, सीमाभागातील लोकांना मराठी भाषेतून कागदपत्रे मिळवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन जनरेटा वाढवला पाहिजे. महाराष्ट्रमधून आपल्याला पाणी, सरकारी नोकरी, खासगी कंपनी मध्ये रोजगार, अशा विविध मार्गाने सीमावासियांना लाभ मिळत असताना आम्ही महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या झेंड्याखाली एकत्र आले पाहिजे. तरच आपली मराठी भाषा जिवंत राहणार आहे. आम्ही गेली तीन महिने झाले मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहोत. त्यांना निपाणीमध्ये सभा घ्यायला पाहिजे, अशी विनंती केली होती. त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन होकार दिला होता. पण अचानक त्यांचा मराठ वाड्यामध्ये दौरा जास्त लांबला. पुढच्या सभा घेणार असून त्याची सुरवात निपाणी तालुक्यातून होणार असल्याचे सांगितले.
ग्रामपंचायत सदस्य जयसिंग मोरे म्हणाले छ. शिवाजी महाराज यांचे विचार घेऊन वाटचाल करणारा आजचा तरुण यशवंत होत असणारच. त्यांचा आदर्श घेतला तरच आयुष्यात माणूस कोणत्याही संकटातुन मुक्त होत असताना दिसतोय. मनोज जरांगे पाटील व महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करून आभार मानले. मनोज जरांगे सोबत सामान्य कुटुंबातील लोक ठाम राहिले त्यामुळे महाराष्ट्र सरकारला मनोज जरांगे पाटील यांची जिद्द आकांक्षा खूप मोठी आहे लक्षात आल्यानंतर शेवटी निर्णय घेणे भाग पाडले व आपल्या मागण्या मान्य करून यशस्वी झाले.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी अध्यक्ष बंडा पाटील म्हणाले, गेली तीन महिने झाले आमच्या संपर्कात आहेत.त्यांनी महाराष्ट्र राज्यातील नेत्यांना बोलून दाखवले होते माझी खूप इच्छा निपाणी तालुक्यात सभा घेण्याची. आम्ही संपर्क करून विचारल होत त्यांनी आम्हाला सांगितले होते निपाणीमध्ये सभा घेणारच आहे तयारीला लागा. पण काही तांत्रिक अडचणीमुळे निपाणीमध्ये त्यांची सभा होऊ शकली नाही.
कर्नाटक गेल्या विधानसभा निवडणूकि अगोदर आम्ही महाराष्ट्र सरकारच्या विभागातुन माहिती मागून घेतली निपाणी तालुक्यातील १० हजार हजार कर्मचारी सरकारी खात्यामध्ये काम करतात. मराठी भाषिक लोकांना एवढी मोठी संधी महाराष्ट्र राज्याने दिली आहे. सीमाप्रश्न नवीन पिढीला समजून सांगितला पाहिजे. आलेली मरगळ झटकली पाहिजे. तुम्ही कोणत्याही राष्ट्रीय पक्षात असा त्याची अडचण आम्हाला नाही पण मराठी भाषेवर आक्रमन ज्या -ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण सर्वांनी एकत्र येऊन त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे.
सीमाभागातमराठा समाज खूप मोठया संख्येने आहे त्यांचा पण विचार आता नवीन निघणारा जीआर आहे. त्यामध्ये सीमाभागातील मराठा समाजाचा उल्लेख झाला पाहिजे. त्यांनी मला शब्द दिला आत्ता होऊ शकत नाही तुमचा हा मुद्दा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या सुरवातीपासून माझ्या मुद्द्यामध्ये समाविष्ट असायला हवा होता. तर करता आले असते.एक महिन्यानंतर तुम्हाला बोलवून घेतो. त्यामध्ये सरकारला दुरुस्त्या करण्यास भाग पाडू असेही मनोज जरांगे यांनी सांगितल्याचे पाटील म्हणाले.
बेळगाव, बिदर, भालकी, निपाणी, कारवार व खानापूर सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा गगनभेदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. प्रवीण पाटील यांनी आभार मानले.यावेळी साखर,पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. सुरवातीला फटाक्यांची आतषबाजी केली.
यावेळी तानाजी वाळके, पांडुरंग डोंगळे, संग्राम जाधव, उदय जाधव, नवनाथ पाटील, सागर जाधव, सुनील वाळके, सयाजी केसरकर, विनोद माने, पांडुरंग भोळे, माजी ग्रा. स. रावसाहेब सुतार, रंगराव चिखले, विलास केसरकर, रावसाहेब पाटील (माजी सैनिक) सीताराम खाडे, संदीप डोंगळे, अक्षय जाधव, साताप्प डोंगळे, अजित पोटले, मानकु कदम, मारुती पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे, सतीश पाटील व सौरभ केसरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta