डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी; कुर्ली हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा
निपाणी (वार्ता) : पुस्तकी ज्ञानासोबत मुलांना बाह्य जगाचेही शिक्षण देण्याची गरज आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती गुरूकुल शिक्षण पद्धतीत जोपासली जात होती. तो आपल्या शिक्षणाचा मूळ पाया आहे. त्याच वाटेवर आधुनिकतेच्या मार्गाने आपली शिक्षण पद्धती वाटचाल करीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे मत निपाणी येथील डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात मुंबई येथील ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट पुरस्कृत दिवंगत बाळाराम पाटील आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष कुमार माळी होते.
एस. एस. चौगुले यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचे स्वरूप स्पष्ट केले. मान्यवरांच्या हस्ते दिवंगत बाळाराम पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. रोपास जलार्पण करून डॉ. कुरबेट्टी यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले.
डॉ. आनंद पाटील यांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व कलेला प्रोत्साहन देण्यासाठी १५ वर्षे या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. भविष्यात चांगले वक्ते निर्माण करण्यासाठी ही स्पर्धा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगितले. मधुकर भोसले यांनी वक्तृत्व कला विकसित करण्याबाबत मार्गदर्शन केले.
विद्यालयाच्यावतीने वैशाली पाटील व डॉ. आनंद पाटील यांचा सत्कार झाला.
स्पर्धेत शांभवी माळकर (पदमराजे गर्ल्स हायस्कूल शिरोळ), अनुष्का जाधव (किसनराव मोरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सरवडे), केदार मगदूम (सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली), रसिका डोंगळे (सरकारी मराठी हायस्कूल मत्तीवडे), सृष्टी मारडेकर (व्हनाळी हायस्कूल), मधुरीमा पाटील (श्रीकाडसिद्धेश्वर सिद्धेश्वर हायस्कूल बेनाडी) व यशराज हेगडे (धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव सातारा) यांनी बक्षीसे पटकाविली. स्पर्धेत बेळगाव, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील ३९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. मधुकर भोसले (बस्तवडे) एम. बी. खिरुगडे (शेंडूर) व टी. एम यादव यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्यांना सुनिल पाटील (नागपूर) मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमास डॉ. आनंद पाटील, वैशाली पाटील, क्षितीज पाटील, वसंत बुधाळे, सीताराम चौगुले, सुधाकर व्हराटे, आनंदा ढगे, रमेश पाटील यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एस. एस. साळवी, के. ए. नाईक, यु. पी. पाटील, एस. एम. वाळके, विजय साळुंखे, सागर कुंभार यांनी परिश्रम घेतले. एस. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.