एम. डी. विद्यालयात कृषी सप्ताह
निपाणी (वार्ता) : ‘ॲग्रीकल्चर’ हेच आपले ‘कल्चर आहे’. ते आपण जपले पाहिजे. लोकांनी शेतकऱ्यांना मानसन्मान द्यावा. सुशिक्षित तरुणांनी शेती व्यवसायाकडे वळून सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून विविध नवप्रयोग करावेत. कडधान्ये, औषधी वनस्पती लागवड करावी. फुलोत्पादन, फलोत्पादन, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, भाजीपाला व फळ प्रक्रिया जोड व्यवसायांच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन कागलचे कृषी पर्यवेक्षक प्रमोद शिंगे यांनी केले.
अर्जुननगर (ता.कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात आयोजित कृषी सप्ताह प्रसंगी ‘कृषी विषयातील करिअरच्या संधी’ या विषयावर ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रकाशभाई शाह उपस्थित होते.
यावेळी शिंगे व मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, पालक आणि वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना शैक्षणिक साहित्य देऊन गौरवण्यात आले. मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले यांनी प्रास्ताविक तर आर. डी. देसाई यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमास आर. डी. पाटील, शिक्षक प्रतिनिधी ए. डी. लकमले, कर्मचारी प्रतिनिधी एस. आर. भोपळे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. एस. व्ही. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एस. एस. मगदूम यांनी आभार मानले.