निपाणी (वार्ता) : अक्कोळ गावातील विविध समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा मागणीचे निवेदन भोज जिल्हा. पंचायतीचे माजी सदस्य राजेंद्र वड्डर यांना ग्रामस्थांतर्फे देण्यात आले.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रियंका जारकीहोळी, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वड्डर यांनी गावातील समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. अक्कोळ गावची लोकसंख्या वाढत आहे. मात्र म्हणावा तसा विकास झालेला नाही. गावातजलशुद्धीकरण केंद्र उभारावे, एस. सी. कॉलनीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनपासून मारुती मंदिर तसेच पाटील मळा ते किल्लेदार वाडीपासून एस. सी. कॉलनीपर्यंत रस्ता तयार करावा. किल्लेदारवाडीत निरंतर ज्योतीची व्यवस्था करावी. अत्याधुनिक बसथांबा उभारावा, ओढ्यावरील पुलाचे बांधकाम करावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. वड्डर यांनी निवेदन स्वीकारून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी धनाजी चव्हाण, सुखदेव नवले, बाबासाहेब किल्लेदार, अजय पुंडे, दिलीप मलाबादे, युवराज भारमल, काकासाहेब सुतार, अरुण मोहिते, सुनील चिंगळे, उत्तम सुतार आदी उपस्थित होते.