व्यावसायिकांमध्ये चिंता; फेब्रुवारीत वाजणार बॅण्डबाजा
निपाणी (वार्ता) : दिवाळी झाली, तुलसी विवाह झाला. मात्र सध्या शुक्रास्त सुरू झाल्याने थेट फेब्रुवारीपर्यंत वधूवरांच्या शुभविवाहाची ‘टाळी’ वाजणे थांबले. तब्बल ५९ दिवस विवाह, भूमिपूजन, गृहप्रवेश व सर्वच शुभकार्य थांबल्याने निपाणीतील व्यापारीपेठ हिवाळ्यात थंड झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक चिंताग्रस्त बनले आहेत.
फेब्रुवारी ते जुलै महिन्यात ४७ मुहूर्त असल्याने सर्वांना वाट पहावी लागत असताना सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार होत असल्याने वधू-वर पिता व नातेवाईकांची धाकधूक वाढत आहे. भारतीय पंचांगात ९ डिसेंबरपासून ४ फेब्रुवारीपर्यंत शुक्रास्त आहे. विवाहासाठी १० फेब्रुवारी पहिली तारीख दाखविण्यात आली. कुठलाच मुहूर्त नसल्याने बाजारपेठेतील दुकानांची आर्थिक उलाढाल मंदावली आहे. गतवर्षी जास्त पाऊस झाल्याने कांदा, सोयाबीन, व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. सध्या शेतकऱ्यांचा खिसा गरम नसल्याने आणि त्यातच सर्व शुभकार्य थांबल्याने बाजारात फक्त जीवनावश्यक वस्तू घेणारे ग्राहक दिसत आहेत.
——————————————————————-
‘शुक्र अस्त म्हणजे शुक्र हा ग्रह सूर्याच्या खूप जवळ जात असल्याने दिसणे बंद होतो. या काळात शुभकार्ये केली जात नाहीत.’
-बाळासाहेब यरनाळरकर, पुरोहित, निपाणी
——————————————————————
‘दिवाळी सणाची उलाढाल जेमतेम झाली असताना आता व्यवसायावर शेतकऱ्यांची अडचण जाणवत आहे. तीन-चार वर्षांत प्रथमच असा शुकशुकाट सर्वत्र जाणवत आहे.’
-जयप्रकाश शहा, व्यावसायिक, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta