कुलसचिव संतोष कामागौडा; बागेवाडी महाविद्यालयात राष्ट्रीय परिसंवाद
निपाणी (वार्ता) : भारत हा अनेक भाषांचा देश असला तरी त्या विविधतेत एकता आहे. भारतीय भाषा कुटुंबे आपल्या इतिहासाचे, संस्कृतीचे, विचारांचे आणि जीवनाचे प्रतिबिंब आहेत. भाषांमधूनच पिढ्यांचे ज्ञान, मूल्ये आणि वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवला जात आहे, असे मत बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलसचिव संतोष कामागौडा यांनी व्यक्त केले. बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बेळगावमधील राणी चन्नम्मा विद्यापीठ आणि भारत सरकारचा नवी दिल्ली येथील भारतीय भाषा समितीच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता.२८) महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सभागृहात आयोजित ‘भारतीय भाषा कुटुंब आणि राष्ट्रीय एकता’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन करून ते बोलत होते.
कामगौडा म्हणाले, भाषा ही समाजाला एकत्र आणण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. एकमेकांच्या भाषांबद्दल समज आणि आदर हा राष्ट्रीय एकतेचा आधार आहे. प्रादेशिक भाषांचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच परस्पर भाषा अभ्यासाला चालना देणे गरजेचे असल्याची त्यांनी स्पष्ट केले.
कलबुर्गी येथील केंद्रीय विद्यापीठातील भाषाशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. भीमराव भोसले यांनी, भारतीय भाषा कुटुंबांची निर्मिती, त्यांचे वैज्ञानिक वर्गीकरण, परस विविध भाषांमधील समानता राष्ट्रीय एकता मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे सांगितले. प्रा. बसवराज डोन्नूर यांनी, बहुभाषिकता हे भारताचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. समकालीन समाजात भाषांचा परस्पर आदर आणि सहअस्तित्व आवश्यक असल्याचे सांगितले. बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठातील इंग्रजी विभागाच्या प्रा. विजया नागनवर यांनी, भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्यातील अंतर्गत संबंध स्पष्ट केले.
भारतीय भाषा समितीने प्रकाशित केलेली २ पुस्तके आणि ‘अक्षरसूर्य’ या संशोधन जर्नलमध्ये प्रकाशित झालेली २ संशोधन पुस्तके अशा एकूण ४ पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी यांनी मनोगत व्यक्त केले.
दुसऱ्या सत्रात झालेल्या चर्चेत कन्नड विषयतज्ज्ञ डॉ. महेश चिंतामणी, हिंदी विषयतज्ज्ञ डॉ. राजेंद्र पवार, मराठी विषयतज्ज्ञ प्रा. रमेश साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. तिसऱ्या सत्रात प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी इंग्रजी, कन्नड, हिंदी आणि मराठी विषयांमध्ये शोधनिबंध सादर केले. डॉ. एस. एम. पानाबुडे, निवृत्त प्राध्यापक आणि डॉ. सी. एन. वाघमोरे, परिषदेत तज्ज्ञ म्हणून सहभागी झाले होते. कार्यक्रमात विविध राज्यांतील संशोधक, विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये बी. एस. कांबळे, सेवानिवृत्त प्राचार्य व्ही. बी. धारवाड, डॉ. आर. जी. खराबे, पी. पी. प्राचार्या हेमा चिक्कमठ, डॉ. एम. डी. गुरव, डॉ. बी. एम. जनागौडा, डॉ. आनंद केंचक्कनवर, डॉ. अशोका राठोड, एस. एस. कुंभर, डॉ. सुनीता हुन्नरागी, एस.पी. पाटील, डॉ. सतीश नायक, मोनिका आर, शकुंतला मेंगाणी, संगीता गुरनागोळ, पूजा खानप्पागोळ, नर्मदा कुराडे व इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
परिसंवादाचे संयोजक डॉ. एस. एम. रायमाने यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रा. शंकरमूर्ती के. एन. पाहुण्यांची परिचय करून दिला. गीता कामते व नमिता नायक यांनी सूत्रसंचालन केले. आयक्यूएसी समन्वयक डॉ.अतुलकुमार कांबळे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta