
गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक; दहावी विद्यार्थ्यांना दिला कानमंत्र
निपाणी (वार्ता) : दहावीच्या परीक्षांना केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांची अभ्यासाच्या वेळापत्रकासह इतर कामांची लगबग सुरू झाली आहे.
वार्षिक परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात भीती, तणाव आणि दडपणाची भावना निर्माण होते. परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, तर स्वतःच्या कष्टांचे मूल्यमापन करण्याची एक संधी आहे.तणाव मुक्त वातावरणात परीक्षा दिल्यास हमखास यश मिळते. त्यासाठी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला जाणे आणि शांत, एकाग्र मनाने पेपर सोडवणे हाच यशाचा खरा मार्ग असल्याचे मत येथील गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी व्यक्त केले.
गटशिक्षणाधिकारी नाईक म्हणाल्या, परीक्षेपूर्वी योग्य तयारी केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात ‘आपण उत्तीर्ण होणार’ हा विश्वास असतोच. हाच विश्वास परीक्षेदरम्यान कायम ठेवणे गरजेचे आहे. प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर घाई नकरता आधी ती नीट वाचावी, परिचित प्रश्न आधी सोडवावेत, ते करीत असताना वेळेचे योग्य नियोजन करावे. मन शांत ठेवले तर आठवलेली उत्तरे योग्य पद्धतीने लिहिता येतात. अनेकवेळा विद्यार्थ्यांपेक्षा पालकांमध्येच परीक्षेचा ताण अधिक दिसून येतो. पालकांनी अपेक्षांचा भार विद्याथ्यर्थ्यांवर टाकण्याऐवजी त्यांना समजून घेणारे, आधार देणारे आणि सकारात्मक मार्गदर्शन करणारे असावे. ‘तू नक्की यशस्वी होशील’ हे दोन शब्द विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुप्पट करू शकतात. शिक्षक, पालक, समाज यांनी मिळून विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. परीक्षेत मिळणारे गुण महत्वाचे असले
तरी त्यापेक्षा विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य अधिक महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास, सातत्य आणि शांतता या तीन गोष्टींच्या जोरावर कोणतीही परीक्षा सहज पार करता येते.
——————————————————————–

विद्यार्थ्यांनी न घाबरता परीक्षा द्यावी
‘विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा ही केवळ गुणांची स्पर्धा नाही. शिकलेल्या ज्ञानाचे सादरीकरण करण्याची संधी आहे. त्यामुळे चुका झाल्या तरी घाबरून न जाता पुढील प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शांत मनाने लिहिलेले उत्तर अधिक प्रभावी ठरते. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहनही गटशिक्षणाधिकारी नाईक यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta