
निपाणी (वार्ता) : जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या एका बैठकीचे प्रसंगी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी बँकेतर्फे शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिल्यास तोटा होत असल्याचे म्हटले आहे. शेतकरी हा अन्नदाता असून त्यांच्यासाठीच जिल्हा मध्यवर्ती बँकेची सरकारने निर्मिती केली आहे. त्यामुळे जोल्ले यांनी हा शब्द मागे घेऊन शेतकऱ्यांची माफी न मागितल्यास कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हासिरू क्रांतीसेनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, जिल्हा बँकेचे अध्यक्षांनी शेतकऱ्याबद्दल बोलताना विचार करून बोलावे. जिल्हा बँक कोणा एकट्याच्या मालकीची नसून ती शेतकऱ्यांची आहे. त्यांनी राजकारण जरूर करावे पण शेतकऱ्यांबद्दल चुकीचे विधान करू नये. जिल्हा बँकेतर्फे कारखाने एमआयडीसी व इतर ठिकाणी कर्ज दिल्यास शेतकऱ्यांची कोणती अडचण नाही. शेतकऱ्यांना कर्ज दिले दिल्यानंतर बँक तोट्यात येत असल्यास आतापर्यंत शेतकऱ्यांना किती कर्ज दिले, आणि किती थकीत आहे, याची माहिती प्रसार माध्यमांना द्यावी. त्यानुसार शेतकरी आपल्या बँकेत येऊन कर्जाची परतफेड करतील.
कर्नाटक राज्यातील ३१ जिल्ह्यामध्ये रयत संघटना जागृत झाले आहे. आपण बँकेचे अध्यक्षपदी काम करण्यास योग्य वाटत नाही. बँकेला कुलूप लावले तरी चालेल पण शेतकऱ्याबद्दल अपशब्द वापरू नये. आतापर्यंत शेतकऱ्याबद्दल चुकीची विधाने करणाऱ्या नेते मंडळींना शेतकरी व रयत संघटनेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष नि तात्काळ शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा भविष्यात त्याचे विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार असल्याचे पोवार यांनी स्पष्ट केले. यावेळी सुनील पाटील, बाबासाहेब पाटील, शिवाजी वाडेकर, मधुकर पाटील, बबन जामदार, एकनाथ सादळकर, चिनू कुळवमोडे, सर्जेराव हेगडे, नितीन कानडे, सागर पाटील, आनंद गायकवाड, दत्ता लाटकर, मयूर पोवार, पिंटू लाड, संजय पोवार, बाळासाहेब ऐवाळे, अक्षय पाटील, दादासाहेब चौगुले, सचिन कांबळे यांच्यासह तालुका रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta