
कुर्लीत शेतकरी गौरव पुरस्कार
निपाणी (वार्ता) : शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून संबोधले जाते. पण निसर्गाचा लहरीपणा शासनाच्या आडमुठे धोरण अशा विविध कारणामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत सापडत चालला आहे. त्यामुळे देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे अवलंबणे आवश्यक आहे. शेतकरी सुखी झाल्यास देशही सुखी बनेल, असे मत महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा चळवळीचे प्रणेते, स्टडी सर्कलचे प्रमुख व कुर्ली गावचे सुपुत्र डॉ. आनंद पाटील यांनी केले. दिवंगत बाळाराम आबा पाटील शेतकरी गौरव पुरस्कार २०२६ वितरण समारंभात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. सन्मान ‘बळीराजाचा’ या संकल्पनेतून कर्तृत्ववान शेतकरी बांधवांचा गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावर्षीचा दिवंगत बाळाराम आबा पाटील शेतकरी गौरव पुरस्कार तानाजी पोवार, ईश्वर पाटील व बाळासाहेब आबणे या शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कारासाठी शेतकऱ्यांची निवड कष्टाळू वृत्ती, अल्पभूधारक पार्श्वभूमी, आभाळाएवढे कष्ट करणारा प्रामाणिक स्वभाव आणि निर्व्यसनी जीवनशैली या निकषांवर करण्यात आली.
डॉ. आनंद पाटील यांनी, ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम असेल तरच देशाची प्रगती शक्य आहे. शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून राष्ट्रनिर्माता आहे. त्याच्या कष्टातून समाजाचे जीवनमान उंचावत असल्याचे स्पष्ट केले.
सन २००९-२०२६ या कालावधीत पुरस्कार प्राप्त झालेल्या सर्व शेतकरी बांधवांचा भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.भावनाताई पाटील यांनी प्रास्ताविकात पुरस्कार उपक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना शेतकऱ्यांच्या सन्मानाची परंपरा अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी सावित्रीबाई पाटील, सुनील पाटील, प्रमोद पाटील, नीलम पाटील, तुळशीदास डोंगरे, विजय पाटील, श्रीकांत पाटील तसेच समस्त शेतकरी उपस्थित होते. युवराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
—
Belgaum Varta Belgaum Varta