
प्रा. डॉ. अच्युत माने; ‘भूतकाळ’ काव्य संग्रहाचे निपाणीत प्रकाशन
निपाणी (वार्ता) : कवी हा जन्मताच कवी नसतो तो परिस्थितीनुसार निर्माण होतो. समाजातील चांगल्या वाईट घटनेवर आपल्या आयुष्यातील सुखदुःखातील घटनेवर कवी कविता लिहित असतो. कविता ही प्रकट व्हावी लागते. ती जन्मावी लागते, असे मत प्रा. डॉ.अच्युत माने यांनी व्यक्त केले. शिप्पुर येथील कवी संजय कांबळे यांच्या विद्रोही ‘भूतकाळ’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवारी (ता.२२) पार पडले. त्यावेळी डॉ. माने बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील प्रा. डॉ. रघुनाथ कडाकणे उपस्थित होते. यावेळी निमंत्रित कवींच्या कविसंमेलनाचा कार्यक्रम येथील महर्षी वाल्मिकी भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता.
प्रारंभी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. प्रमोद कांबळे यांनी स्वागत तर रमेश देसाई यांनी प्रस्ताविक केले.
डॉ. माने म्हणाले, विद्रोह हा चिंतन, जगण्यातून येतो तर क्रांतीची प्रेरणा पुस्तकातून मिळते. चळवळ केल्याशिवाय परिवर्तन होत नाही. भूतकाळ आठवतांना परिवर्तनाचा संघर्ष करायला हवा. सत्य शोधावे लागत नसून जगण्यातून ते सापडत असल्याचे सांगितले.
दलित क्रांती सेनेचे संस्थापक अशोककुमार असोदे, सुरेश कांबळे, प्रा. मुकुंद कांबळे, प्रकाश पाटील, संजय शितोळे, सुनील गस्ती, रघुनाथ कडाकणे, प्रा. नानासो जामदार, प्रा. एन. डी. जत्राटकर , प्रा. जे. डी. कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संपादक व कवी उमेश शिरगुप्पे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निमंत्रितांच्या कवी संमेलनात प्रा. रघुनाथ कडाकणे, कबीर वराळे, शालिनी पवार, रंगराव बन्ने, किरण मेस्त्री, गजानन पाटील, सरस्वती डवरी, संजय कांबळे, उमेश शिरगुप्पे यांनी आपल्या कवितेतून उपस्थिताना मंत्रमुग्ध करून सोडले. कवी संजय कांबळे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta