
प्रा. डॉ. गजानन राशिंगकर; बागेवाडी महाविद्यालयात विज्ञान चर्चासत्र
निपाणी (वार्ता) : नवनवीन तंत्रज्ञानामुळे जग मुठीत आले आहे. पण त्याचा वापर करण्याची आपली जबाबदारीही वाढली आहे. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजीसारख्या क्षेत्रात प्रगती करत आहे. त्यातून तरुण शास्त्रज्ञांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रायोगिक अभ्यास, संशोधन आणि नाविन्यपूर्ण शोधांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे, असे मत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ गजानन राशिंगकर त्यांनी व्यक्त केले. बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात विज्ञान विभागातर्फे आयोजित ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उदयोन्मुख ट्रेंड्स’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
डॉ.राशिंगकर म्हणाले, विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे दैनंदिन जीवनात होणारे बदल शक्य होत आहेत. विज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नवीन औषधांचा शोध, जलद निदान पद्धती आणि लसींचा विकास, मानवी जीव वाचवण्यात मोठी भूमिका बजावत आहेत. देशात आणि परदेशात वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर लोकांना सोपे आणि जलद उपचार देत आहे. आजच्या तरुणांनी प्रश्न विचारण्याची वृत्ती विकसित करण्याचे आवाहन केले.
केएलई संस्थेच्या स्थानिक मंडळाचे सदस्य रवींद्र शेट्टी यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
समन्वयक एस. बी. पाटील यांनी स्वागत केले. आयक्यूएसी समन्वयक डॉ. अतुलकुमार कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
चर्चासत्रात विविध राज्यांतील ८० हून अधिक प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांनी दोन परिषदांमध्ये आपले संशोधन सादर केले. निवडक प्रकाशित संशोधन पत्रांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्राचार्य डॉ. एम. एम. हुराळी यांनी तंत्रज्ञानाच्या विकासात वास्तव, नीतिमत्ता आणि मानवता असावी. तंत्रज्ञानाने मानवांना नियंत्रित करण्यापेक्षा त्यांना मदत केली पाहिजे. विज्ञानाच्या प्रगतीसोबतच मानवी मूल्यांचेही जतन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास निवृत्त प्राचार्य डॉ. एम. बी. कोथळी, डॉ. बी. एस. कांबळे, निवृत्त प्राध्यापक प्रा. व्ही. बी. धारवाड, डॉ. एस. बी. सोलबन्नावर, डॉ. एम. एम. शंकरीकोप्प, डॉ. आर. जी. खराबे, प्राचार्या हेमा चिक्कमठ, डॉ. एस. एम. रायमाने, शंकरमूर्ती के.एन., महेश केंचागौडढर, तेजस्विनी नंदी, डॉ. काव्यश्री कुमुर, सागर मिर्जी उपस्थित होते. गीता कामते आणि सौम्या पाटील यांनी सूत्रसंचालन संचालन केले. डॉ. अशोक राठोड यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta