
दुपारीच बाजारपेठा ओस; थंडपेयांना वाढती मागणी
निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, रविवारी कमाल तापमानाने ३० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या सुमारास रस्त्यांवरील वर्दळ घटल्याचे चित्र दिसून आले.
सकाळी काहीसे आल्हाददायक वातावरण असले, तरी दुपारी १२ नंतर उन्हाची तीव्रता वाढत आहे. मुख्य बाजारपेठ, आंतरराज्य मार्ग, महामार्ग परिसरात दुपारच्या वेळी तुलनेने कमी हालचाल दिसून आली. अनेकांनी अत्यावश्यक कामेसकाळीच उरकण्यास प्राधान्य दिले आहे.
दुपारी रस्त्यांवर फक्त गरजेपोटी बाहेर पडणाऱ्यांचीच वर्दळ आहे. उन्हाच्या झळांमुळे दुचाकीस्वार आणि पादचारी त्रस्त झाले आहेत. अनेकांनी डोक्यावर रुमाल,टोपी किंवा स्कार्फ बांधूनच गॉगलचा वापर करत प्रवास सुरू केला आहे. थंड पेये, उसाचा रस, लिंबूपाणी, ताक, लस्सी आणि आइस्क्रीम विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी वाढत आहे.
——————————————————————–
निपाणी येथील तापमान मापक यंत्रे बंद
येथील रयत संपर्क केंद्र, कृषी केंद्र आणि सार्वजनिक बांधकाम कार्यालयामध्ये तापमान आणि पर्जन्यमान मापक यंत्रे कार्यरत होते. पण काही महिन्यापासून तीनही ठिकाणचे तापमान मापक बंदच आहेत. त्यामुळे नागरिकांना नेमके तपमान समजणे कठीण झाले आहे.
—
Belgaum Varta Belgaum Varta