डॉ. सतीश जाधव; बागेवाडी महाविद्यालयात मराठी भाषा गौरवदिन
निपाणी (वार्ता) : मराठी ही केवळ बोलण्याची भाषा नसून आपल्या सामाजिक संस्कृतीची, इतिहासाची आणि शान आहे. मराठी भाषेला संत साहित्य, शाहिरी, पोवाडे, तसेच आधुनिक साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज यांच्यासारख्या संतांनी मराठीला आध्यात्मिक उंची दिली आहे. तर कवी कुसुमाग्रज यांच्यासारख्या साहित्यिकांनी तिला लोकांच्या मनाशी जोडले, असे डॉ. सतीश जाधव यांनी व्यक्त केले. के एल ई. संस्थेचे जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात मराठी विभागातर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिन आणि कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून लेखकांच्या भेटीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुण म्हणून धारवाड विद्यापीठातील मानसशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. सतीश जाधव बोलत होते.
सोनाली पाटील यांनी स्वागत केले. डॉ. जाधव म्हणाले, विशिष्ट वयात आलेले अनुभव त्याचवेळी शब्दरूपाने मांडल्यास त्यातील वास्तविकता वाचकाच्या मनाचा ठाव घेत असल्याचे सांगून त्यांनी लिहिलेल्या ‘पुरेसा मित्र’ या पुस्तकातील आढावा घेतला. प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी यांनी, युवकांनी इतर ठिकाणी वेळ वाया न घालवता ग्रंथालयाचा उपयोग करून मराठी किंवा कोणतीही भाषा असो, वाचनात आपला वेळ घालवावा. जगात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे, तो फक्त यामुळे नव्हे तर तो अधिक वाचनाने होत आहे, प्रगती करायची असेल तर चांगली भाषा असली पाहिजे. भाषेच्या अभ्यास केला तर आपली प्रगती नक्की होत असल्याचे सांगितले.
मराठी विभाग प्रमुख डॉ. श्रीपती रायमाने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमास आयक्यूएसी समन्वयक डॉ. अतुलकुमार कांबळे, संगीता गुरवान, डॉ. बसवराज जनगोडा, डॉ. ए. डी गुरव, प्रा. शंकरमूर्ती क. एन, श्री. नागराज बेळगावकर, डॉ. आनंद केंचेंकनवर, प्रा सागर मिरजे, प्रा. रुपा. आकिवेटे, प्रा. मोनिका आर. डॉ. सुनिता हुन्नरगी, रेवती गिरीमल यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
गायत्री मधाळे यांनी सूत्रसंचालन केले. वैष्णवी माळी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta