
निपाणी बाजारात द्राक्षांची आवक; उत्पादन घटल्याने ऐतिहासिक दर
निपाणी (वार्ता) : निसर्गाच्या तडाख्याने यंदा द्राक्ष खायला काय, बघायलासुद्धा मिळणार नाही… अशी स्थिती होणार असल्याचे बोलले जात होते. त्याचा प्रत्यय आता यायला लागला आहे. अथणी, कागवाड, मिरज, खंडेराजुरी परिसरात अवघे ६० टक्के उत्पादन येणे दृष्टिपथात असल्याने मागणीच्या तुलनेत निपाणी परिसरात पुरवठा कमी होत असल्याने द्राक्षांचे दर कधी नव्हे एवढे कडाडले आहेत. स्थानिक द्राक्षांची शेतकऱ्याकडून घाऊक पद्धतीने ८०-९० रुपये किलोने खरेदी सुरू आहे तर बाजारपेठेत किरकोळ द्राक्षे १४० ते १६० रुपये प्रतिकिलो घराणे विक्री सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना द्राक्षे दलाचा गोडवा असला तरी ग्राहकांना मात्र द्राक्षे आंबटच लागत आहेत.
दरवर्षी जानेवारीच्या मध्यानंतर खवैय्यासाठी जिभेवर गोड, रसाळ चव आणणाऱ्या द्राक्ष हंगामाचा श्रीगणेशा होतो. यंदाचे वर्ष शेतकऱ्यांची कसोटी पाहणारे ठरले. सलग सात महिने पावसामुळे बहुतांश द्राक्षबागा यंदा बहरल्याच नाही. सरासरी ४० टक्के बागा द्राक्षविनाच आहेत. त्याचा परिणाम हंगामावर झाला असून महिनाभर उशिराने द्राक्ष हंगामाचा पडदा बाजूल्य सरकला आहे.
उत्पादन कमी निघत असल्याने द्राक्षाच्या बाजारभावाला सोन्याची झळाळी आली आहे. पण बागेत द्राक्षेच मागणीपेक्षा पुरवठा कमी होत आहे. पावसाच्या तडाख्याने बागांचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक अडचणी सापडला आहे. सोनाका, थॉमसन, सुधाकर या वाणांचे दर बाजारात १३० ते १४० रुपये किलोपर्यंत पोचले आहेत. निर्यातीला फ्लेम, काळ्या रंगाच्या द्राक्षांचे दर १५० ते १७० रुपये पर्यंत झेपावले आहेत. येथील महात्मा ज्योतिबा फुले फळ भाजीपाला मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडून मात्र कमी दराने द्राक्षांचे सौदे सुरू आहे. येथील मार्केटमध्ये कर्नाटकासह पुणे, नाशिक येथून दररोज कमी जास्त प्रमाणात द्राक्षांची आवक होत आहे.
——————————————————————-
‘गेल्या आठवड्यापासून अथणी, कागवाड, केंपवाडसह पुणे, नाशिक येथून द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. पहिल्यांदा अतिवृष्टी व महापूरामुळे बागांचे नुकसान होऊन उत्पादन कमी निघत आहे. त्यामुळे हंगामाच्या प्रारंभी द्राक्षांचे दर वाढले आहेत.’
– कुतुबुद्दीन मोमीन, द्राक्ष खरेदीदार व्यापारी, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta