
निपाणी (वार्ता) : रमजानचे उपवास सुरू झाले असून मुस्लिम बांधवांची रात्री उशिरापर्यंत ये-जा असते. तसेच पहाटे लवकर उठून नमाज अदा करतात. त्यामुळे शहर, उपनगरातील प्रत्येक मार्गावर सकाळ-सायंकाळी गर्दी होत आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून पोलिसांना सहकार्य करावे. यंदा भीषण पाणी टंचाई असल्यामुळे रंगपंचमी साजरी करताना पाण्याचा अपव्यय टाळा, केमिकलऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करावा. मंगळवारी धूलिवंदन असून सध्या परीक्षा सुरु आहेत. परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर अनोळखी मुली व महिलांवर रंग उडवू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांनी केले.
धुळवड, रंगपंचमी आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
कार्जोळ म्हणाले, सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली असून पाणीटंचाईला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे यंदा धुळवड आणि रंगपंचमी सण साधेपणाने साजरे करून पाण्याचा दुरुपयोग टाळावा. याशिवाय मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान सण सुरू असून या काळात धुळवड आणि रंगपंचमी खेळताना हिंदू मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. हिंदू मुस्लिम बांधवांनी, पारंपरिक उत्सवाचे महत्त्व जोपासत धुळवड, रंगपंचमी आणि रमजान हे सण एकत्र शांततेत साजरे करावेत, अशा सूचना संबंधित भागातील तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व नागरिकांना देण्यात आल्या.
यावेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना पोलिसांनी उत्तरे दिली. बैठकीस अस्लम शिकलगार, माजी सभापती जुबेर बागवान, अल्लाबक्ष बागवान, माजी नगरसेवक सद्दाम नगारजी, फारुख गवंडी, सदाशिव तावदारे, फारूक पटेल, हनिफ नगारजी, टिपू नणदी, लियाकत मुल्ला, बक्तियार कोल्हापुरे यांच्यासह शहर आणि उपनगरातील हिंदू व मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta